
नागपूर – नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे हद्दीतील मस्कासाथ परिसरात प्रेमसंबंध आणि जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आवेश खान हा आपला मित्र रिझवान शेख याच्यासोबत गन्न्याच्या रसाच्या दुकानाजवळ उभा होता. त्याचवेळी आरोपी सुरेंद्र होले, गन्या कोराटकर, सक्षम मौंदेकर आणि विनीत कोराटकर हे तेथे आले. काही क्षणांतच जुन्या वादावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आवेश खान हा आरोपीच्या गर्लफ्रेंडशी बोलत असल्याच्या संशयातून आरोपी संतप्त झाले होते. याच रागातून आरोपींनी त्याच्यावर मारहाण करत चाकूने वार केला. या हल्ल्यात आवेश खान गंभीर जखमी झाला आहे.
घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच तहसील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी सुरेंद्र होले याच्यावर यापूर्वी 33 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या साथीदारांचाही गुन्हेगारी इतिहास असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करत आहेत.








