पहिल्याच जनता दरबारात नागरिकांची प्रचंड गर्दी
संवाददाता / मक़सूद अली
यवतमाळ। राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात जनतेला दिलासा देणारा जनता दरबार राज्यात रोल मॉडेल ठरला असून त्याची दखल पक्षस्तरावर ही घेण्यात आली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा वरून आता मुंबई येथे शिवसेना भवनातही शिवसेना मंत्र्यांचा नियमित जनता दरबार भरणार आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री ठरलेल्या दिवशी शिवसेना भवनात उपस्थित राहून जनतेच्या समस्या ऐकून घेत त्या सोडविणार आहेत.
या श्रृखंलेत आज मंगळवारी राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुंबईतील शिवसेना भवन येथे आपल्या पहिल्या जनता दरबाराचा प्रारंभ केला. सकाळी 11 वाजता ना. संजय राठोड शिवसेना भवनात पोहचले. तेथे अगोदरच उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांनी यावेळी ना. राठोड यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी एकच गर्दी केली. यवतमाळ जिल्ह्यात घेतलेल्या जनता दरबारांप्रमाणेच शिवसेना भवनात ना. संजय राठोड यांनी तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत महसूल विभागा संदर्भातील अनेक समस्या जागेवरच सोडविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. अर्जदारांना अंतिम उत्तर देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. ना. संजय राठोड दर मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात मुंबई येथे शिवसेना भवनात उपस्थित राहणार आहेत. मुंबई येथील या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.