- जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य विभागाचा आढावा
- मातामृत्यू झाल्यास संबंधीतास क्षमा नाही
- प्रत्येक गावात प्रत्येक महिन्यात लसीकरण
- प्रसुती कमी असलेल्या उपकेद्रांवर कार्यवाही
यवतमाळ। प्रसुतीदरम्यान किंवा काही दिवसानंतर होणारे मातामृत्यू अतिशय गंभीर बाब आहे. गर्भवती महिलेची प्रसुतीपुर्वी किमान चार ते पाच वेळा आरोग्य तपासणी झालेली असते. त्यामुळे मातामृत्यू व्हायलाच नको. यापुढे मातामृत्यू आढळल्यास संबंधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत्यूमागची वास्तविक कारणे सादर करावी लागतील. यात हयगय आढळून आल्यास कार्यवाहीस सामोरे जावे लागतील, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
बचत भवन येथे आरोग्य विभागाची दिर्घ बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड.राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.राठोड, क्षयरोगचे सहाय्यक संचालक डॉ.भगत, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुरेश तरोडेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
गर्भवती माता कुणाची आई, बहिण असते याची जाणीव असणे आवश्यक आहे. सदर महिलेची प्रसुतीपुर्वी चार ते पाच वेळा आरोग्य तपासणी झालेली असते. प्रसुतीस काही अडचणी निर्माण होत असल्यास या तपासणीदरम्यान निदर्शनास येवू शकतात. त्याप्रमाणे उपचार करता येते. असे असतांना होणारे मातामृत्यू अतिशय गंभीर बाब आहे. यापुढे मातामृत्यू होणार नाही याची काळजी घेण्यासोबतच असे मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आणा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मातामृत्यू झाल्यास त्या क्षेत्रातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी तत्काळ स्वत:हा दुरध्वनी करून माझ्या निदर्शनास आणून द्यावे आणि सायंकाळी 6 वाजता स्वत:हा सर्वानी उपस्थित राहुन मातामृत्यूची कारणे पुरेसा कारणासह सादर करावी. कारणे योग्य न वाटल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बजावून सांगितले.
जिल्ह्यात होणाऱ्या प्रसुती या वैद्यकीय संस्थेतच होणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रसुती घरी होता कामा नये. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये महिन्यातून एकदा आरोग्यसत्र व लसीकरण कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. ज्या दिवशी ज्या गावांमध्ये कार्यक्रम असतील तेथे शालेय आरोग्य तपासणी पथकासह आवश्यकता भासल्यास अन्य कर्मचारी, अधिकारी वर्ग मागवून घ्यावा. डॉक्टरांची समाजामध्ये फार चांगली प्रतिष्ठा आहे, ही प्रतिष्ठा जपण्यासोबतचे रुग्णांच्या कल्याणासाठी डॉक्टरांनी प्रामाणीकपणे काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व उपस्थितांना केल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रनिहाय प्रसुतीचा आढावा घेतला. अनेक उपकेंद्रामध्ये गेल्या महिन्यात एकही प्रसुती झाली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अशा उपकेंद्रातील कंत्राटी एएनएमला नोकरीवरून काढून टाकण्यासोबतच नियमित एएनएमची वेतनवाढ थांबविण्याची कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आठवड्यातून चार दिवस अचानक भेटी
जिल्हाधिकारी म्हणून रुजु झाल्यानंतर तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर सोमवार, मंगळवार वगळता उर्वरित चार दिवस अचानक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह विविध शासकीय कार्यालयांना भेटी देण्यात येणार आहे. याची जाणीव प्रत्येकाने करून घ्यावी. या भेटीत गैरहजर किंवा रुग्णांकडे दुर्लक्ष आढळून आल्यास सदर प्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिक कामाची स्वत:ला सवय लावून घ्यावी, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.