Published On : Tue, Oct 6th, 2020

शास्त्री ले-आऊट जवळील नाल्यावरील पुलाचे काम ताबडतोब पूर्ण करावे – डॉ. आशिष देशमुख

Advertisement

खामला परिसराजवळील शास्री ले-आऊट, ट्रस्ट ले-आऊट व त्रिशरण नगर या वस्त्यांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाचे महानगर पालिकेतर्फे अर्धवट काम झालेले आहे. मागील दीड वर्षापासून हा रस्ता येण्या-जाण्याकरीता बंद आहे. त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतो. या पुलाचे काम त्वरित करण्यात यावे व नागरिकांचा त्रास दूर व्हावा, यासाठी माजी आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी नागरिकांच्या उपस्थितीत पुलाची पाहणी केली.

“मागील दीड वर्षांपासून या भागातील नागरिक रस्ता बंद असल्यामुळे त्रस्त आहेत. लोकप्रतिनिधींनी या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. नाल्यावरील पुलाचे काम ताबडतोब पूर्ण करावे व नागरिकांची समस्या दूर करावी”, अशी सूचना डॉ. आशिष देशमुख यांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.

या प्रसंगी राकेश पन्नासे, मंगेश कामोने, तांबाजी चौधरी, अशोक चौधरी, भय्याजी वाटकर, विजय गेडाम, अजबराव कोठे, संजय दलाल, प्रशांत लोखंडे, राहुल पाटील, शशिकांत जुंघरे, देशपांडे काका, सोपानराव सिरसाट,अरविंद गोतमारे, उमेश दयालकर आदी उपस्थित होते.