नागपूर : जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? असा थेट सवाल राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमाद्वारे केला आहे.
Featured Products
आपल्या एक्स माध्यमावरील पोस्ट मध्ये बावनकुळे म्हणतात, “केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले. पण या जातीतील नागरिकांना प्रगतीच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या वर्षात या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. आता आदरणीय मोदीजी यांच्या सरकारने या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून या देशातील सर्वच जाती प्रवाहांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प केला असताना त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत, यातून या विरोधी पक्षांची संकुचित मानसिकता देशाला पुन्हा एकदा दिसून आली आहे.”
पुढे ते म्हणतात, “देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जातीनिहाय जनगणनेसारखा क्रांतिकारी निर्णय घेतला. तेव्हा किमान अभिनंदन करण्याचे सौजन्य या नेत्यांनी दाखवावे.” त्यांच्या या पोस्टवर विरोधकांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









