Published On : Thu, May 10th, 2018

राहुल गांधींच्या घोषणेने अस्वस्थ होण्याचे कारण काय – संजय राऊत

Advertisement

मुंबई : सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारसभेत आपण पंतप्रधान होण्याबाबत भूमिका मांडली आहे. लोकशाहीत सगळ्यांनाच आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणी खिल्ली उडविण्याची गरज नाही. खुद्द नरेंद्र मोदीसुद्धा लोकशाहीने दिलेल्या याच अधिकाराच्या माध्यमातून पंतप्रधान झाल्याचे वक्तव शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. खरे पाहता त्या वेळी लालकृष्ण अडवाणी हेच पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. अशीही भूमिका अनेकांनी घेतली होती, असा टोलाही राऊत यांनीमोदींवर लगावला.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्याबाबत जी भूमिका मांडली, त्यामुळे भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांनी अस्वस्थ होण्याचे काहीही कारण नाही. राहुल यांचा पराभव करा आणि त्यांना रोखा हा त्यावरचा एकच पर्याय आहे. आजही काँग्रेस देशात सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ च्या निवडणुकीत विशिष्ट वातावरणामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे राऊत म्हणाले. राहुल यांच्या भूमिकेवर संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्ष काय तो निर्णय घेतील. आम्हाला शरद पवार लायक उमेदवार वाटतात. मोदी, जेटली, अडवाणी या प्रत्येकात क्षमता आहे. खुर्चीवर बसल्यावर सर्वांमध्ये क्षमता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा शिवसेना युतीबाबत राऊत म्हणाले की, भाजपात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वबळावर निवडणूक लढवणे ही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. शिवसेनेच्या निर्णयावर कुणी दबाव आणू शकणार नाही. पालघरप्रमाणे गोंदिया-भंडारा मतदारसंघातील निवडणूक लढवावी, अशी शिवसैनिकांची भावना आहे. शिवसेनेला ताकद आणि स्वाभिमान दाखविण्याची ही संधी आहे. पालघरबाबत भाजपाचा निर्णय दुर्दैवी आहे. ज्यांनी वनगांविरुद्ध निवडणूक लढविली, त्यांनाच भाजपाने उमेदवारी दिली. पालघरची जागा भाजपाची असती, तर त्यांना काँग्रेसच्या माजी नेत्याला उमेदवार म्हणून घोषित करण्याची वेळ आली नसती. मुख्यमंत्र्यांना सहकार्याची अपेक्षा असेल, तर त्यांनी काँग्रेसमधून आलेला त्यांचा उमेदवार मागे घ्यावा. छगन भुजबळ हे राजकीय विरोधक असले, तरी त्यांच्याशी व्यक्तिगत वैर नाही. बाळासाहेबांची साथ ज्यांनी सोडले, त्या प्रत्येकाची स्थिती अशीच झाली, असेही राऊत म्हणाले़