मुंबई – राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना सर्वच राजकीय पक्ष ताकद पणाला लावत आहेत. महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी आघाड्या, युती, उमेदवारांची पळवापळवी अशा घडामोडींना वेग आला आहे. अशाच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा राजकीय झटका बसला असून, नुकतेच निवडून आलेले १२ नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
हा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते तथा मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी संजीव नाईक, दीपक म्हात्रे यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित राहणार आहेत.
‘हे’ १२ नगरसेवक भाजपमध्ये दाखल-
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये
दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड यांचा समावेश आहे.
आघाडीतील तणाव, कारवाई आणि बंड-
अंबरनाथ शहरात याआधी अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. या आघाडीत भाजप, अजित पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश होता. त्यामुळे काँग्रेसने भाजपसोबत युती केल्याची चर्चा राज्यभरच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही रंगली होती.
या घडामोडींची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित १२ नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली. यामुळे काँग्रेसचे अंबरनाथ ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील नाराज झाले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आणि अखेर या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेससाठी मोठं खिंडार-
निवडून आलेले नगरसेवक पक्षादेश न पाळता स्वतःच्या निर्णयाने भूमिका घेत असल्याचा आरोप या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. पक्षनिष्ठा, शिस्त आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,अशा परिस्थितीत विश्वास ठेवायचा तरी कुणावर? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
भाजपसोबत जाणार नाही;हर्षवर्धन सपकाळ-
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
भाजपसोबत आमचा कोणताही संबंध नाही. निवडणूक लढवताना त्यांच्याशी कोणतीही युती किंवा घरोबा केलेला नाही. आमच्या नगरसेवकांनी भाजपला कोणताही पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांकडून खुलासा मागितल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.
एकूणच, अंबरनाथमधील या घडामोडींमुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.









