Published On : Mon, Sep 9th, 2019

बुटी बोरीतील सुसाट वाहनांना कोण लावणार ब्रेक

Advertisement

नागपूर:- अरुंद रस्ते आणि बेसुमार वाहने यामुळे बुटीबोरीतील बहुतांश रहदारीच्या रस्त्यावरून चालणे पादचाऱ्यांना कठीण होऊन बसले आहे.वाहनांच्या वेगावर कोणाचेही नियंत्रण नाही आणि कानाला मोबाईल लावून चालणाऱ्या कॉलेज तरुणांना कुणाचाही धाक नाही.अशा परिस्थितीत रस्त्याने पायदळ चालणाऱ्या पादचारी अबालवृद्धांना छातीत धडकी भरत असल्यामुळे जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागत असल्याची स्थिती सध्या बुटी बोरीत बघावयास मिळते.

बुटीबोरी हे जवळपास च्या २०/२५ गावाची मोठी बाजारपेठ आहे.त्यामुळे येथे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आसपासच्या खेड्यातील ग्रामस्थ येथे वाहनानेच ये जा करतात.येथे आठवडी बाजार, बँक,महाविद्यालये असल्याने बँकेत,बाजारात येणाऱ्यासह महाविद्यालयीन तरुणांनाचे लोंढेच्या लोंढे येथून बस,ऑटो सह दुचाकीनेच येत असतात.तर बुटी बोरी हे आशिया खंडातील सर्वात मोठे औधोगिक क्षेत्र असल्याने येथे आसपासच्या खेड्यावरन येणारा कामगार वर्गही खूप मोठ्या प्रमाणात आहे.शिवाय सध्याघाडीला येथील आकर्षणाचे केंद्र असलेला “बुटीबोरीचा राजा” सध्या बसलेला असून येथिल भव्य रोषणाई,झुले,खेळणी हे विशेष आकर्षण आहे.त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी खूप आहे.

विशेषतः येथे असलेला रस्ता हा आधीच कमी असून या रस्त्यावरच दुकाने व दुकानासमोरील अवैध पार्किंग यामुळे हा पुन्हा लहान झाला आहे.त्यातल्या त्यात बुटीबोरी च्या राज्याची रोषणाई करीता लावलेला लवाजमा यामुळे रस्ता अजूनच अरुंद झाला असून अशा अरुंद रस्त्यावरही सध्या सुसाट वाहने चालविणाऱ्या या वाहनाचा वेग आबालवृद्धांच्या छातीत धडकी भरवत आहे.

त्यांना रस्ता ओलांडताना खूप सावधानी बाळगावी लागत असून थोड्श्या नजरचुकीमुळे भरधाव वाहनाने जीव गमविण्याचा धोका आहे.यामुळे निर्माण होणाऱ्या या गंभीर समस्येकडे पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून वाहनांच्या सुसाट वेगावर करकचून ब्रेक लावावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.