मुंबई : राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांची शिकवण सक्तीची केली असून, यावर मोठ्या प्रमाणात विरोध व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीने यावर जोरदार टीका केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राऊत म्हणाले, “मराठी भाषा आणि संस्कृतीवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात मराठी साहित्यिक, अभिनेते, क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनी आवाज उठवावा. पण सध्या कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित आणि आमचे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुम्हांसाठी टाळ्या वाजवल्या, खांद्यावर घेतलं, पण मराठी भाषेवर हल्ला होत असताना ते गप्प आहेत. त्यांना काही म्हणण्याची गरज का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय राऊत यांनी साहित्यिकांवरही निशाणा साधला. “९०% साहित्यिक पुरस्कार प्राप्त मंडळी आणि त्यांचे मुले सध्या परदेशी शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांच्या मुलांना ना मराठीचा गंध आहे, ना हिंदीचा काही विचार आहे. त्यामुळे अशा साहित्यिकांना या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही,” असं त्यांना म्हणणं होतं.
राऊत यांचं हे वक्तव्य मराठी अस्मितेवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी केलं असून, त्यांनी मराठी समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आणि राजकीय नेत्यांना या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.