Published On : Thu, Aug 8th, 2019

वीज कर्मचा-यांचा दररोज मृत्यूशी सामना

Advertisement

नागपूर : दररोज प्रत्यक्ष मृत्यूला सामोरे जाण्याचे धाडस करणारा महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडतांना देशाच्या सीमेचे प्रत्यक्ष रक्षण करणा-या सैंनिकाप्रमाणेच प्राणाची बाजी लावीत लढवय्याप्रमाणे आपले काम करीत असतो. आपल्या सैंनिकांना दररोज युद्धाभ्यास करावा लागत असला तरी, प्रत्यक्ष रणांगणावर लढायची संधी त्यांना क्वचितच मिळत असतांना, महावितरण कर्मचारी मात्र दररोज वीजरुपी आक्राळ-विक्राळ शत्रूचा सामना शुर लढवय्याप्रमाणे करीत असतो.

त्यातल्या त्यात पावसाळा म्हणजे वीज कर्मचा-यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कुठेही कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करून महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य निभावित असल्याने वीज कर्मचा-यांवर दोषारोपण करणे टाळावे, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातील वीजवितरण यंत्रणेत अनेक बिघाड उद्भवतात, याचा राग ग्राहकांकडून वीज करमचा-यांवर काढ़ला जातो, मात्र वीज जाण्यामागिल कारणांचा विचारही कुणी करीत नाहीत, रात्री उशीरा वीजपुरवठा खंडित होतो आणि काही वेळेनंतर तो परत सुरळित होतो, एकीकडे सर्वत्र आधुनिकीकरणाच्या दिशेने काम सुरु असले तरी उपरी वीजवाहीन्याची यंत्रणा सुरु अथवा बंद करण्यासाठी आजही मणुष्यबळाची गरज आहे, पाऊस सुरु असतेवेळी वीजपुरवठा खंडित झाला म्हणजे कुणीतरी जनमित्र अंधा-या रात्री भर पावसात आपल्या प्राणाची पर्वा न करता वीजखांबावर चढून आपले कर्तव्य बजावित असतो. याची नोंद वीज ग्राहकांनी घेणे आवश्यक आहे.

अश्यावेळी वीज कंपनीवर दोषारोपण करण्याएवजी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी होत असलेले प्रयत्न विचारात घेणे आवश्यक आहे. याशिवाय वीज खांबात वीज प्रवाहीत होऊ नये यासाठी वीज खांबांवर चॉकलेटी अथवा पांढ-या रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर्स बसविलेली असतात, बहुतांश वेळा अधिक उन अथवा वीज प्रवाहामुळे ही इन्सुलेटर्स गरम होतात आणि त्यावर पावसाच्या पाण्याचा एक थेंब पडला तरी ती फ़ुटतात आणि यामुळे वीज खांबांमध्ये वीज प्रवाहीत होऊन जमिनीत जाते अश्यावेळी स्वयंचलीत प्रणाली कार्यान्वित होऊन वीजवाहीनीचा पुरवठा खंडित होतो.

यदाकदा अश्यावेळी वीजपुरवठा बंद न झाल्यास प्राणांकीत आणि वित्त हानी होण्याची संभावना अधिक असते. वीजवाहिनीत अकस्मात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास वीज उपकेंद्रातील कर्मचारी नजिकच्या उपकेंद्रासोबत संपर्क साधून तेथील वीजपुरवठ्याची स्थिती जाणून घेतात. वीजपुरवठा सुरळीत झाल्याची योग्य शहानिशा केल्यानंतरच वीजवाहीनीचा वीजपुरवठा सुरु केला जातो, आणि वाहीनी बंद झाली असल्यास संबंधित वाहिनी नादुरुस्त म्हणून जाहीर केल्या जाते. वाहीनीत झालेला बिघाड शोधणे देखील एकप्रकारे तारेवरची कसरत असते, पाऊस आणि अंधाराची पर्वा न करता शोध मोहीम राबविल्या जाते, कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व वीज खांबांची तपासणी करावी लागते तर कधी काही खांबांदरम्यान बिघाड सापडतो. हे सर्व करीत असतांना लागणारा वेळ बघता ग्राहकांनीही महावितरणची अडचण समजून घेणे आवश्यक असते.

आज नागपूर शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे वीजवितरण वाहिन्यांची मोठ्या प्रमाणात क्षती झाली आहे, खोदकामा तुटलेले केबल जोडल्या गेली असली तरी अनेकदा जोड असलेल्या बागात पाणी साचल्याने तो केबल नादुरुस्त होऊन वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो, अश्यावेळी हा बिघाड नेमका कुठे झाला हे शोधून काढणे जिकरीचे काम असतांनाही वादळ-वारा याची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याप्रती सदैव सजग असलेला वीज कर्मचारी प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीतही ग्राहकाला वीज मिळावी यासाठी झटत असतो. वीजपुरवठा खंडित होताच अनेकदा ग्राहक संबंधित जनमित्र किंवा अभियंत्याला फ़ोन करणे सुरु करतात मात्र अश्यावेळी फ़ोनवर बोलण्याएवजी वीजपुरवठा सुरळित करायला त्याचे प्राधान्य असल्याने तो फ़ोन घेण्यास असमर्थ असतो, ही बाब लक्षात घेता ग्राहकानी महावितरणच्या निशुल्क कॉलसेंटरला किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.