Published On : Thu, Mar 11th, 2021

उन्हाळ्यात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जलप्रदाय समितीने दक्ष रहावे : जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई

Advertisement

अवैध नळ कनेक्शन कापण्याचे सभापतींनी दिले निर्देश

नागपूर : उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाई भासू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विशेष समितीने दक्ष रहावे, असे आवाहन जलप्रदाय समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप गवई यांनी केले आहे. बुधवारी (ता. १०) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांनी उन्हाळा २०२१ ची पूर्वतयारी यासंदर्भात आढावा बैठक घेतली.

बैठकीत माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, जलप्रदाय समितीच्या उपसभापती सरला नायक, जलप्रदाय समितीचे सदस्य सर्वश्री लहुकुमार बेहते, भुट्टो अहमद, दिनेश यादव, सदस्या मनिषा कोठे, जयश्री वाडीभस्मे, शिल्पा धोटे, वैशाली नारनवरे, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, ओ.सी.डब्ल्यू. चे अधिकारी, दहाही झोनचे डेलीगेट, दहाही झोनचे प्रकल्प व्‍यवस्थापक आदी उपस्थित होते.

बैठकीत २४ x ७ पाणीपुरवठा योजना, अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत आढावा, उन्हाळा २०२१ बाबत पूर्वतयारी तसेच बॉटलींग प्लॉन्ट इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांनी शहरात सुरू असलेले अवैध नळ कनेक्शन तत्काळ कापून त्यांच्यावर करवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच शहरात कुठल्याही भागात नविन पाईपलाईन टाकताना तेथील नगरसेवकांशी समन्वय साधावा अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली. संदीप गवई पुढे म्हणाले, झोन मध्ये काम करताना कुठलीही तात्रिक अडचण आल्यास ओ.सी.डब्ल्यू., पाणी पुरवठा विभाग, जलप्रदाय समितीच्या सदस्यांशी चर्चा करावी. समन्वय साधून समस्येचे निराकरण करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही याची सर्व अधिकाऱ्यांनी काळची घ्यावी. कुठल्याही झोन मधून नागरिकांची तक्रार येताच तत्काळ संबंधित तक्रारीचे निवारण करण्याचे निर्देश यावेळी जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांनी दिले. तसेच अमृत योजनेच्या कामांना गती देण्यात यावी. व शहरात मंजूर झालेल्या ठिकाणीच पाण्याच्या टाक्या तयार करण्यात याव्‍यात, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले. यंदाचा उन्हाळा मुख्य लक्ष्य आहे. नागरिकांना पाण्याची कोणतीही समस्या येउ नये यासाठी मनपाचे पाणी पुरवठा विभाग आणि ओ.सी.डब्ल्यू. चे अधिकारी पूर्ण ताकदीने काम करतील असे आवाहन जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांनी केले.

टिल्लू पम्प लावण्याऱ्यांवर कारवाई करा : माजी स्थायी समिती सभापती विजय झलके
बैठकीला उपस्थित माजी स्थायी समिती सभापती विजय झलके यांनी नळ कनेक्शन वर टिल्लू पम्प लावणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. गरज पडल्यास यासाठी पोलिसांचीही मदत घेता येईल असेही म्हणाले. पुढे ते म्हणाले, रिपोर्टनुसार गतवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक असणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या वाढण्याची चिन्हे अधिक आहे. यासाठी नेटवर्क टँकर वाढविण्याच्या सूचनाही यावेळी माजी स्थायी समिती सभापती विजय झलके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.