वर्धा: जिल्ह्यातील अल्लीपूर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा निमित्त भव्य बैल सजावट स्पर्धा व बैलपोळा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा खरा सोबती असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची आकर्षक सजावट करून स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे अ आणि ब अशा दोन गटांत आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट बैलजोडी सजावट आणि खांदा या निकषांवर परीक्षण करून प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक निवडण्यात आले.
विजेत्या बैलजोडी मालकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक नितीन चंदनखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार संगिता हेलोंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनराज सुपारे, माजी सरपंच माणिक कलोडे, समाजसेवक विजय जैस्वाल, रामदास रेवतकर आणि गजानन कापसे उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, सचिन पारसडे, विजय कवडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे यांनी केले, तर आभार ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी : सतीश काळे, वर्धा




