‘आरोग्य संवाद’ फेसबुक लाईव्हमध्ये तज्ज्ञांचा सल्ला
नागपूर : कोरोना नंतर आता डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. मात्र यामुळे घाबरून जायची गरज नाही. कोरोनाच्या भीतीच्या प्रादुर्भावातही नागरिकांनी जागरून राहून त्यावर मात कशी करायची, सुरक्षा कशी बाळगायची हे शिकून घेतले. डेंग्यूमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. आपली जबाबदारी आणि सतर्कता हे आपल्याला कुठल्याही आजारापासून दूर ठेवू शकते. डेंग्यूच्या प्रतिबंधासाठीही ही बाब अत्यंत आवश्यक आहे. सौम्य स्वरूपात डेंग्यूची कुठलीही लक्षणे दिसल्यास लगेच चाचणी करणे व घरी अथवा रुग्णालयातही असले तरी नियमित व्यवस्थित निगराणी करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ सीनियर कन्सल्टंट डॉ. संजय मराठे व प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा आयएमएच्या उपाध्यक्ष डॉ.मंजुषा गिरी यांनी दिला.
नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी (ता. २५) बालरोगतज्ज्ञ सीनियर कन्सल्टंट डॉ. संजय मराठे व प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा आयएमएच्या उपाध्यक्ष डॉ.मंजुषा गिरी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी तज्ज्ञांनी ‘डेंग्यू ताप : लहान मुलांमधील लक्षणे व उपचार’ या विषयावर संवाद साधला आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.
एडिस इजिप्टाय हा डेंग्यूचे विषाणू पसरविणारा डास स्वच्छ पाण्यात वाढतो आणि मुख्य म्हणजे तो दिवसा चावतो. लहान मुलांची डेंग्यूपासून काळजी घ्यायची असेल तर दिवसाच जास्त घेणे आवश्यक आहे. लहान मुले दिवसा खूप झोप घेतात. त्यामुळे त्यांना झोपविताना डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक अगरबत्ती अथवा विद्युत उपकरणे लावावित. मुलांना डासांपासून संरक्षण कसे करायचे हे शिकवावे. मुले जिथे खेळायला जातात त्या भागात पाणी साचले नाही, खुली विहीर नाही कचरा वाढलेला नाही याकडे लक्ष द्यावे. यासोबत मुलांना व मोठ्यांनीही पूर्ण बाह्याचेच कपडे वापरावेत, असे आवाहनही दोन्ही तज्ज्ञांनी केले.
डेंग्यू झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही. डेंग्यूचे सुमारे ९० ते ९५ टक्के रुग्ण हे पूर्णपणे बरे होतात. यामध्ये २ ते ३ टक्के रुग्णांनाच रुग्णालयामध्ये भरती करण्याची वेळ येते. यातील एखादा टक्केच रुग्ण धोकादाय स्थितीमध्ये जातात. त्यामुळे डेंग्यूला घाबरण्याऐवजी तो कसा पसरतो, त्यासाठी प्रतिबंधात्मक काय काळजी घ्यावी, कशी निगरानी ठेवावी याबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे. डेंग्यूमध्ये रुग्णांचे ‘प्लेटलेट्स’ कमी झाले की नातेवाईक घाबरून जातात. मात्र प्रत्यक्षात ‘प्लेटलेट्स’ कमी झाले तरी बाहेरून ते देण्याची गरज फार कमी पडते. अनेक रुग्णांना ‘प्लेटलेट्स’ कमी झाल्याने पपईच्या पानांचा रस देण्याचा प्रकार घडतो. ही अत्यंत चुकीची बाब आहे. पपईच्या पानांच्या रसाने ‘प्लेटलेट्स’ वाढत नाहीत उलट त्यामुळे इतर गंभीर परिणामही होउ शकतात. त्यामुळे घरगुती उपचार करणे टाळावे, असेही आवाहन डॉ. संजय मराठे व डॉ.मंजुषा गिरी यांनी केले.
लहान मुलांमध्ये डेंग्यूच्या लक्षणांची काही चेतावणी संकेत दिसून येतात ते त्वरीत ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बाळ सुस्त राहत असेल, सतत उलट्या करीत असेल, पोटावर दुखत असेल, हातापायावर सूज असेल, कॉफीसारखी उलटी होणे किंवा शौच डांबरासारखी होणे या बाबींकडे दुर्लक्ष करू नये हे डेंग्यूचे चेतावणी संकेत असू शकतात. त्यामुळे त्वरीत डॉक्टरांकडे जाउन तपासणी करून घ्यावी. मुलांना कोव्हिडचा धोका जास्त संभावू शकतो त्यामुळे सतर्क रहावे, असेही ते म्हणाले.