
नागपूर : विदर्भासह राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी गुरुवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सलील देशमुख उपस्थित होते. शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातील परिस्थितीही गंभीर असल्याचा दावा त्यांनी केला. विदर्भातील अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतही ३० ते ६० टक्क्यांपर्यंत पावसाची कमतरता असल्याचे त्यांनी नमूद केले.
पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम झाला असून, आगामी रब्बी हंगामावरही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विलंब न करता दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांसोबतच शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांनाही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.
भाजपचा राजकीय खेळ पार्थ पवारांना समजेल-
पार्थ पवार आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुद्द्यावरूनही रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘पार्थ पवारांना आता भाजपचा राजकीय खेळ समजेल. मित्रपक्षातील नेत्यांनाही भाजप कसे अडचणीत आणते, हे पुढे स्पष्ट होईल,’ असा टोला त्यांनी लगावला.
देवरी तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कथित गैरव्यवहारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावर प्रश्नचिन्ह-
२३ सप्टेंबर रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. एफडीए पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला का, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पेपरफुटीच्या प्रकरणांची कठोर चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.




