मुंबई : महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा बदलताना दिसत असून, कधी उष्णता तर कधी गारवा असा अनुभव नागरिक घेत आहेत. काही भागांत अचानक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा वाढला असून, जानेवारीतील थंडी हळूहळू कमी होत आहे.
तापमानात चढ-उतार-
राज्याच्या अनेक भागांत तापमानात सातत्याने बदल जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी जाणवत होती, मात्र आता सकाळ-संध्याकाळीही हवामान तुलनेने उष्ण वाटत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, अशा सतत बदलणाऱ्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरात हिवाळा जवळपास संपल्याचे चित्र आहे. किमान तापमानात सुमारे तीन अंशांची वाढ झाली असून, दिवसा उष्णतेची तीव्रताही वाढली आहे. सकाळी थंडी कमी जाणवत असून, दुपारच्या वेळेस उष्ण व घामाघूम वातावरण जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी जाणवलेली थंडीची लाट पूर्णतः ओसरली आहे.
ढगाळ हवामानामुळे पुणे आणि परिसरात हवेत दमटपणा वाढला आहे. तापमान ११ अंश सेल्सिअसच्या वर राहिल्याने हिवाळ्याची चाहूल जवळपास नाहीशी झाली असून, नागरिकांना दमट हवामानामुळे त्रास होत आहे.
७ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा-
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत हलका ते मध्यम अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज असून, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जानेवारी संपत असतानाही राज्यात पावसाचे ढग सक्रिय असल्याने, सतत बदलणाऱ्या हवामानाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. प्रशासनाने नागरिकांना हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.










