नागपूर: शुक्रवारपासून सुरु झालेल्या मध्यभारतातील सर्वात मोठ्या अॅग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनात महाऊर्जा या संस्थेने आपल्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या स्टॉलला शेतकर्यांनी आणि नागरिकांनी सर्वाधिक गर्दी केली. या स्टॉलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन स्टॉलचे उद्घाटन केले आणि या प्रकल्पांचे आणि कार्याचे कौतुक केले आहे. याप्रसंगी महाऊर्जाचे महासंचालक कांतिलाल उमाप आणि अतिरिक्त महासंचालक वाघमारे उपस्थित होते.
आगामी काळ हा सौर ऊर्जेचा, शाश्वत ऊर्जेचा काळ आहे. यादृष्टीनेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौर ऊर्जेबद्दल जनजागृती करून या ऊर्जेचे महत्त्व लोकांसमोर आणले. सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना दिली. आणि आज समाजातील हजारो कुटुंब आणि शेतकरी सौर ऊर्जेची मागणी करीत आहेत. सौर ऊर्जेसोबतच हरित इमारत कशी असावी याचे एक सुंदर मॉडेल या स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. वीज कमी लागावी, ऊर्जेचे संवर्धन व्हावे या दृष्टीने इमारतीचे बांधकाम कसे असावे, याची माहिती या स्टॉलवर देण्यात येत आहे.
नव्हे उपलब्ध असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती महाऊर्जा नागपूर चमू आलेल्या प्रत्येकाला देत आहेत. 400 चौरस मीटर जागेत हा स्टॉल लावण्यात आला आहे.
महाऊर्जाच्या या स्टॉलवर रूफ टॉप सोलर प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी, सौर ऊर्जेवर चालणारा ग्रामीण पाणीपुरवठा, मायक्रो ग्रीड सोलर प्रकल्प, पाण्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, सौर ऊर्जेवर चालणारे कोल्ड स्टोरेज, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, पवनऊर्जा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, सौर गोठा व त्यापासून पशुसंवर्धन, सौभाग्य योजना अशा प्रकल्पांचे मॉडेल्स येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अत्यंत सुबक आणि जीवंतपणा असलेले हे मॉडेल्स महाऊर्जाचे नागपूर येथील प्रादेशिक संचालक सारंग महाजन यांच्या नेतृत्वात नागपूरच्या चमूने प्रचंड मेहनतीने तयार केले आहेत. केवळ एका दिवसात 15 हजारावर लोकांनी या स्टॉलला भेट देऊन महाऊर्जाच्या प्रकल्पांची माहिती घेतली.