रायगड : खालापूरमधील इरर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडीत बुधवारी दरड कोसळली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तर, १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत दाखल ग्रामस्थांशी संवाद साधत धीर दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे आश्वासनही त्यांनी ग्रामस्थांना दिले.
ही घटना दुर्दैवी असून याठिकाणी मी फक्त तोंड दाखवण्यासाठी आलो नाही. तर, भविष्यात तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील बऱ्याच वस्त्या दरडग्रस्त कधीही होऊ शकतात. पण, म्हणून आपण जबाबदारी टाळू शकत नाही. ही घटना घडण्यापूर्वी येथील पुनर्वसन झाले पाहिजे होते. पण तसे झाले नाही आणि दुर्दैवाने ही घटना घडली.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तरुण आणि महिलांना नोकरीची व्यवस्था करावी. आमच्याकडून पुनर्वसन होईपर्यंत ज्या गोष्टींची मदत लागेल, ती करू,असेही ठाकरे म्हणाले.