Published On : Sat, Jul 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या लावा शिवारमध्ये दोन १५ वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ!

Advertisement

नागपूर : नागपूर तहसीलमधील लावा शिवार परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून दोन १५ वर्षीय किशोरांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाडी म्हाडा कॉलनीतील गणेशनगरमधील पाच मित्र – गुलशन माहोरे (१७), सार्थक कुमकुमवार (१७), धीरज उर्फ छोटू नारनवारे (१५), नैतिक वानखेडे (१५) आणि रुद्रसिंग (१५) – गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास लावा शिवारातील खाणीत पोहायला गेले होते. त्यातील तीन जण काठावर बसले होते, तर धीरज आणि नैतिक पाण्यात उतरले.

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तैरत असताना धीरजचा तोल गेला आणि तो बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नैतिकदेखील खोल पाण्यात गेला आणि दोघेही गडप झाले. परिसरात असलेल्या एका व्यक्तीने धीरजला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

इतर घाबरलेल्या मित्रांनी तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती दिली. वाडी पोलिसांना दुपारी दीडच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली आणि ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. धीरजचा मृतदेह एका नागरिकाने बाहेर काढून अमेरिकन ऑन्कोलॉजी रुग्णालयात नेला. नैतिकचा मृतदेह मात्र खोल पाण्यात अडकलेला होता. वाडी अग्निशमन विभागाचे जवान वैभव कोलस्कर यांनी अथक प्रयत्न करून नैतिकचा मृतदेह बाहेर काढला.

घटनेची माहिती मिळताच नैतिकची आई घटनास्थळी धावत आली. मुलाचा मृतदेह पाहताच तिचा आक्रोश परिसरातील प्रत्येक मन हेलावून गेला. मृतदेहांचे पोस्टमार्टम शासकीय रुग्णालयात करण्यात आले.

पोलिस व अग्निशमन विभागाचे जवान तत्पर :
पीएसआय भागवत कलिंगे, हेड कॉन्स्टेबल रेशकुमार राणे, महेश झुन्नाके, मानकर व देवराव हलामी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. फायरमन वैभव कोलस्कर, ड्रायव्हर कपिल गायकवाड आणि फायरमन आनंद शिंदे यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.

पूर्वीही झालेली होती अशीच घटना :
सूत्रांच्या माहितीनुसार, ही खाण दिलीप भगत नावाच्या नागरिकाच्या मालकीची आहे. विशेष म्हणजे, सहा वर्षांपूर्वी याच खाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने या ठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केली नाही. यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisement
Advertisement