Published On : Sat, Jun 20th, 2020

तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले

Advertisement

राज्य सरकारने सभागृह घेण्याचे स्पष्ट केले होते. आतापर्यंत सभेपासून पळ काढणाऱ्या आयुक्तांनी प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरासाठी तयार राहावे, असे आव्हान सत्ताधाऱ्यांनी केले होते. सत्ताधाऱ्यांचा अविश्‍वास आणण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही; मात्र, विरोधकांनी स्थगनद्वारे प्रस्ताव आणल्यास जनहिताच्या मुद्‌द्‌यावर अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्‍यता सत्तापक्ष नेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या महापालिका सभेत आयुक्तांविरुद्ध पदाधिकारी, सदस्य असा सामना रंगणार असल्याचे संकेत मिळाले होते.

शनिवारी (ता. 20) प्रस्तावित सभेबाबतचे पत्र आयुक्तांनी राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठविले. राज्य सरकारने कोव्हिडबाबत नियमाचे पालन करून सभा घेण्याबाबत प्रशासनाला पत्र दिले, अशी माहिती देतानाच आयुक्तांचे वर्तन लोकशाहीविरुद्ध असल्याचा घणाघात सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी केला होता. राज्य सरकारने दिलेल्या अभिप्रायाने लोकप्रतिनिधींचा विजय झाला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.

तीन महिन्यांतील आयुक्तांची कार्यप्रणाली नियमबाह्य होती, असा आरोप करीत तिवारी यांनी केला होता. पितळ उघडे पडण्याच्या भीतीने सभागृहच होऊ द्यायची नाही, अशी आयुक्तांची भूमिका होती. लोकप्रतिनिधीच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी आयुक्तांची कृती आहे. लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याची नियोजनबद्ध पद्धत ते अवलंबवित आहे, असाही आरोप त्यांनी केला होता. आतापर्यंत ज्या प्रश्‍नांच्या उत्तरापासून आयुक्त पळ काढत होते, त्याची उत्तरे देण्यासाठी आयुक्तांनी आता तयार राहावे, असे आव्हान त्यांनी दिले होते.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी रेशीमबागेतील भट सभागृहात सुरू होताच वाद सुरू झाला. काही दिवसांत या वादाची पार्श्वभूमी तयार झाली होती. प्रश्‍नोत्तराच्या तासांत कॉंग्रेस सदस्य हरीश ग्वालवंशी यांच्या केटीनगर येथील जागेच्या आरक्षाणावर प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांची आयुक्तांसोबत चांगलीच खडाजंगी झाली. काही नगरसेवकांनी त्यांच्यावर टीका केली. यानंतर तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहसोडून निघून गेले.

आयुक्तांच्या उत्तराने सारेच झाले होते अवाक

16 जूनला महापौर संदीप जोशी यांनी गटनेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर सभेबाबत आयुक्तांना पत्र दिले होते. परंतु, दोन दिवस त्यांनी उत्तर दिले नाही. अखेर महापौरांच्या मेल’वर त्यांनी उत्तर पाठविले. “सभेचा निर्णय तुम्ही घेतला, त्यामुळे तुम्हीच व्यवस्था करा’ असा मेल आयुक्तांनी महापौरांना केल्याबाबत दयाशकर तिवारी यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.