Published On : Sat, Jun 20th, 2020

आपल्या स्पेंडिंग पॉवरची (खर्च करण्याची ताकद) दिशा पूर्ण देशाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकेल – अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

Advertisement

सोशल मीडिया हे सामाजिक, राष्ट्रीय संवेदनांच्या आदान- प्रदानाचे मूक्त व्यासपीठ आहे, ह्याच माध्यमाने 65% युवा असलेला आपला देश 100% आर्थिंक स्वातंत्र्य प्राप्त करून कोरोना व्हायरस महासंक्रमणात संपूर्ण स्वावलंबी बनण्याचा राष्ट्रवाद स्थापित करेल.

सोशल मीडियातून जपानसारखा राष्ट्रवाद शक्य !

जागतिकस्तरावर निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाने जगभरातील अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचविला आहे. पर्यायाने माणसांच्या जगण्याचा दृष्टिकोनही बदलला. विकासाची नवी परिभाषा यानिमित्ताने केली जाईल. आता जगभरातच स्पर्धा निर्माण होईल. अशावेळी सोशल मीडियाद्वारे स्वदेशी आणि राष्ट्रवादाच्या माध्यमातून कोरोनासारख्या संकटावर मात करता येईल. कोरोनाने जगभरात निर्माण झालेले आर्थिक मंदीचे सावट आणि शेजारी चीनच्या घुसखोरीसारख्या नकारात्मक घटनांंना राष्ट्रवादाच्या बैठकीत बसवविल्यास 100 टक्के आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गावर आपला देश अग्रेसर होईल. मात्र, यासाठी आपले उत्पादन, आपले उत्पादक अन् आपले उत्पन्न हा मुख्य उद्देश्य हवा. केवळ 100 टक्के ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच सर्व संघटीत-असंघटीत व्यापारी, उत्पादकांना, सेवाउद्यमींना सोशल मीडियाच्या माध्यमातून एका इ-कॉमर्स व्यासपीठावर आणून राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याची गरज आहे. संपूर्ण स्वदेशी उत्पादनयुक्त जीवनमान व राहणीमाण म्हणजेच ‘आत्मनिर्भर भारत’ होय.

‘स्टॅटिस्टा’ संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणानुसार सध्या भारतात 40 कोटींहून अधिक नागरिक सोशल मीडियाचा नियमित वापर करतात. हीच संख्या 2023 पर्यंत जवळपास 44.80 कोटींचा टप्पा गाठणार आहे. 2020 मध्ये 60 कोटींहून अधिक भारतीय कोणत्या ना कोणत्या प्रकारे पूर्ण वेळ इंटरनेटचा वापर करीत आहेत. हाच आकडा 2023 पर्यंत 67 कोटींपर्यंत जाईल. विकिपीडियानुसार, आपल्या देशात 65 टक्के नागरिक युवा वर्गात येतात. या दोन जमेच्या बाजू जगभरात सर्व क्षेत्रात शिखर गाठण्यास सक्षम आहेत.

 

आजच्या युवकांची संवादकला, जीवनशैली सोशल मीडिया प्रभावित आहे. हाच 65 टक्के युवा वर्ग उद्योग, व्यापार आणि सेवा उद्यमाला देशाच्या पाळामुळात पोहोचवू शकतो. जगभरातून भारतात आयात होणारे उत्पादन आणि तंत्रज्ञानाला बगल देत, समांतर वा अधिक गुणवत्ताधारक संशोधनात्मक व नाविण्यपुर्ण उत्पादन निर्माण करणे याच युवकांद्वारे शक्य आहे. या उद्दीष्टप्राप्तीसाठी मुख्य संवाद व संकल्पनेचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. प्रतिस्पर्धी चीनने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जगभरात औद्योगिक महासत्ता बनत आपले आर्थिक वर्चस्व गाजविले आहे. केवळ विदेशी उत्पादनांचा निषेध व्यक्त करून वा सार्वजनिक स्थळी विदेशी उत्पादनाच्या विरोधात शक्ती प्रदर्शन करून विशेष फायदा मिळणे शक्य नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण पर्याय उपलब्ध करून देणे हेच अधिक व्यावसायिक, नागरिकांच्या राष्ट्रीय संवेदना 100 टक्के जागृत आहेत आणि त्यासोबत जनता तडजोड करणार नाही हे त्रिवार सत्य आहे. आता आपणसुद्धा ‘जपान पॅटर्न’ अंमलात आणण्याची अतिशय गरज आहे.

दुसर्या महायुद्धात 1945 मध्ये अमेरिकेने जपानवर अणूबॉम्बचा हल्ला केला होता. हा हल्ला जपानींना राष्ट्रवादाच्या शिखरावर पोहोचवण्यास सकारात्मकरित्या यशस्वी ठरला. लाखो लोकांचा बळी गेला मात्र जपानी नागरिकांनी 100 टक्के स्वदेशीला प्राधान्य दिले. त्यामुळे जपानमध्ये साधी सुईसुद्धा परदेशातून सहज येऊ शकत नाही. परिणामी आज जपान पूर्णत: स्वावलंबी आहे. यामध्ये सोशल मीडिया, डिजिटल अवेअरनेसचे योगदान मोलाचे आहे. आपल्या देशातसुद्धा आपला राष्ट्रवाद केवळ आंदोलने, जाळपोळ आणि निषेध यापुरती मर्यादित न राखता नेटिझन्सच्या माध्यमातून औद्योगिक आणि सोशल मीडियाची सांगड घालून 100 टक्के ‘मेड इन इंडिया’ स्थापन करावे लागेल. नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वदेशी व आयातीत उत्पादनांचे संपूर्ण वर्गीकरण मांडून देणे, व्यावसायिकांना त्या पद्धतीचे पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे.

स्वतंत्र, एकसंघ आणि नि:शुल्क ई-कॉमर्स यंत्रणा स्थापून देत नियमित डिजिटल व्यावसायिक प्रशिक्षण देणे सर्वोत्तम पर्याय आहे. राष्ट्रवाद आणि चंगळवाद यापैकी जनता देशालाच निवडणार आहे. याच राष्ट्रवादाच्या रेषेला ओढत स्वदेशीचा नवा आणि कायमस्वरूपी पायंडा घालणे शक्य आहे. कृषी उपयोजित उत्पादने, इंधन, वाहने, औषधी व वैद्यकीय उपकरणे, मोबाइल-संगणक तंत्रज्ञान, रसायने, अभियांत्रिकी, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स -इलेकट्रीकल्स, वाहने ते थेट खेळणे, सुटे भाग, पॅकिंग उद्योग, फर्निचर किंवा बांधकाम साहित्य आदी सर्वच आयातीत पर्यायांसाठी अधिक गुणवत्ता असणारे उत्पादने, सेवा निर्माण करणे, प्रगत करणे म्हणजे औद्योगिक राष्ट्रवाद. दुर्गम गावातील सुद्धा शेतकरी, आदिवासी बांधव सोशल मीडिया आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपले उत्पादन आपल्यापर्यंत पोहोेचवेल आणि शहरी सुपर मॉल्स, दुकाने आदी त्याला मुख्य दर्शनी व्यासपीठावर प्रोत्साहित करतील तेव्हा आपला देश हा जपानसारखा आर्थिक, औद्योगिकदृष्ट्या पूर्ण स्वावलंबी होईल.

सोशल मीडियाने आपला राष्ट्रवाद आणि सकारात्मकता नेहमीच सिद्ध केली आहे. अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणजे हैदराबाद येथील डॉ. रेड्डी यांच्या हत्याकांडानंतर सोशल मीडियावर जगभरात संताप निर्माण झाला. ‘न भूतो न भविष्यती’ मार्गाने कोणताही मोर्चा, आंदोलने न होता पोलीस विभागाकडून गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. मात्र, सोशल मीडियाच्या प्रभावी दखली अभावी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील बहुचर्चित ‘निर्भया’ प्रकरणात हे शक्य झाले नाही. डॉ. रेड्डी प्रकरणानंतर देशातील नागरिकांनी प्रथमच स्वच्छ मनाने पोलिसांवर फुले उधळली, आदराने सन्मान केला. सोशल मीडियाच्या सामाजिक, राष्ट्रीय ताकदीचे दुसरे जिवंत उदाहरण म्हणजे कोरोना संसर्ग आणि लॉकडाउन. प्रथमच अनुभवलेल्या भीतीदायक संक्रमणाला आणि लॉकडाउनमध्ये चिघळलेल्या सामाजिक भावनांचा सोशल मीडियाने उद्रेक होऊ दिला नाही. संपूर्ण देशात नागरिकांना प्रचंड मानसिक दबावातसुद्धा सोशल मीडियाने घरीसुद्धा भावनिक, मानसिक तारतम्यात ठेवले. कुठेही जनतेचे भावनिक रणकंदन माजताना दिसले नाही. धार्मिक तेढ निर्माण करणार्या काही घटना वगळता आजपर्यंत सर्व व्यवस्थित आहे. उलट सोशल मीडियाद्वारे जनतेने स्वत:च सर्व बाजुंनी मोर्चे सांभाळत पोलीस, प्रशासन, वैद्यकीय मंडळी, पालिका आदींचे मनोबल कायम उंचावून धरले आहे. मग हाच सोशल मीडिया, ह्याच राष्ट्रवादी जनतेला हाताशी धरून जनतेसाठी 100 टक्के स्वदेशी औद्योगिक आणि आत्मनिर्भर क्रांती घडवून आणेल याबाबत तीळमात्र शंका नाही.

देशभरात असंख्य नावीन्यपूर्ण संशोधने होत असतात. विविध उत्पादने-तंत्रज्ञान जन्म घेत असतात आणि असंख्य नवनवीन व्यावसायिक संकल्पना उदयास येत असतात. या सगळ्यांना एकसंघ आणत सोशल मीडियाद्वारे एक-दुसर्यांशी संलग्नित करत विविध लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांची सांगड घालणे आवश्यक आहे. लघु – कुटीर उद्योग म्हणजे देशाच्या रक्तवाहिन्या, बारा बलुतेदार यंत्रणा म्हणजे आपल्या देशाचा सोन्याचा धूर काढणार्या काळाचा यशस्वी फॉर्म्ाुला. आता तोच फॉर्म्ाुला ई-कॉमर्सच्या माध्यमातून पुन्हा समीकरणात आणण्याची वेळ आली आहे. सर्वांनी वैयक्तिकरीत्या ‘मेड इन इंडिया’चा संपूर्ण स्वीकार करीत अधिक चांगली, स्वस्त उत्पादने मागणे, निर्माण करणे व उत्पादकांना त्याबाबत सहाय्य करीत आपली जबाबदारी निभाविण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक सर्व सहाय्यता, मार्गदर्शन व मदत सरकार दरबारी विविध मंत्रालयाकडून दिली जात आहेच. त्याचे सोने बनविणे आपल्याच हातात आहे.

छोटे मोठे किराणा दुकान, न्हावी दुकान, धोबी-इस्त्री दुकान, कपडे शिलाई दुकान, सायकल-गाडी रिपेरिंग दुकान, फल – भाजी दुकान, स्टेशनरी दुकान, खेळण्याची दुकान, होटल-ज्युस दुकान, भांडे-मुर्ती दुकान, सुतार कामाचे दुकान, चर्मकारी, चपला बुटांचे दुकान, वेल्डींग-फेब्रीकेशन दुकान, बांधकाम साहित्य एवं हार्डवेयर दुकान, चष्मे- घड्याळांचे दुकान, होजीयरी दुकान, टायर- स्पेयर दुकान, सभागृह एवं सांस्कृतिक भवन, आयुर्वेदिक औषधांची दुकाने इत्यादी एवं सर्व छोटे – मोठे उत्पादक, सेवा उद्यमी यांना इ कॉमर्स साठी सम्पूर्ण डिजिटल प्रशिक्षण व सहायता प्रकल्प चालवणे आवश्यक आहे.

केवळ चिनी, विदेशी उत्पादने जाळून आपला राष्ट्रवाद व जबाबदारी सिद्ध होणार नाही. सुदूर ग्रामीण भागातील कर्मयोगी हासुद्धा आपल्या शहरातील मॉलमध्ये उत्पादन विकेल आणि तुम्ही-आम्ही सहर्ष ते घरी नेऊ, तेव्हा भारताचे विश्वगुरू बनण्याचे मार्ग अधिक प्रशस्त होतील. जेव्हा आपल्या गावात, शहरात ‘मेड इन इंडिया’ मॉल, दुकाने सजतील तेव्हा आपला सुवर्णकाळ जपानपेक्षा अधिक उजळ राहील यात तीळमात्र शंका नाही. मात्र, याकरिता जपानी नागरिकांनी स्वीकारलेला स्वदेशीचा मंत्र आणि राष्ट्रवाद भारतीयांनासुद्धा अंमलात आणावा लागेल.

एक साधी सुई सुद्धा तयार न करणारी जेब बोझोश यांची एमेझॉन ही बहुराष्ट्रीय कंपनी जगभरात ई-कामर्स व्यवसाय करते. चिनची अलिबाबा ही संपुर्ण स्वदेशी ऑनलाईन संस्था जगभरात चिनमध्ये निर्मित लघु उद्योजकांना स्थापित करीत आहे. संपुर्ण संसाधने, समग्र स्थिती असतांना आपण का नाही?

– अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक