Published On : Mon, Aug 26th, 2019

गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ – सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Advertisement

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा श्री. पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गाचे श्री देशपांडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, “यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून, ते तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.”

पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलद गतीने सुरु असून, जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तिथे आवश्यकतेनुसार, रोड स्ट्रीप्स, सूचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतिरोधक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिली.