Published On : Sat, Jan 13th, 2018

शौचालयांच्या अस्वच्छतेबाबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही

Advertisement

नागपूर: सार्वजनिक शौचालय नियमित स्वच्छ राहत नसल्याने नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. ज्या एजन्सीकडे शौचालयाच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे त्यांच्याकडून यापुढे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा केल्यास यापुढे काम करता येणार नाही असे खडेबोल मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या एजन्सीच्या प्रतिनीधींना सुनावले.

शनिवारी (ता. 13 जानेवारी) मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी मोरभवन आणि गणेशपेठ येथील शौचालय आणि परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घेतला. तसेच आवश्यक मुलभूत सुविधांबाबतचे निर्णय तत्काळ घेऊन कार्याला प्रारंभ करण्यात यावे असे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले. यावेळी प्रामुख्याने अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, एसटी महामंडळ विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई, धरमपेठ झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे, धंतोली झोनचे सहायक आय़ुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जय़स्वाल, महामंडळाचे विभागीय अभियंता सतीश कटरे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, उपअभियंता केदार मिश्रा यांची उपस्थिती होती.

आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी स्वच्छता असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनानेही स्वच्छता एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्या कामाचा आढावा घेणे आणि एजन्सी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे की नाही. य़ावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अधिका-यांची प्रामाणिकपणे पार पाडावी तसेच काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा मात्र कामात हलगर्जीपणा खपवून घेऊ नका असे स्वष्ट़ निर्देश आयुक्तांनी दिले.

…अन कचरा बघून आयुक्त संतापले

गणेशपेठ येथील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी एजन्सीकडे देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून काम केले जात नसल्याचे आढळून आहे. एजन्सी काम करत नसल्याने मनपाच्या यंत्रणेला गेल्या 8 दिवसांपासून स्वच्छता करावी लागली. त्यात रोज ढिगभर कचरा निघत असल्याचे दिसून आले. हे दिसताच आयुक्तांनी एजन्सीच्या प्रतिनीधीला फटकारले. जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली नाही तर काम करु देणार नसल्याचे स्पष्ट शब्दात आयुक्तांनी सांगितले.