चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने प्राणघातक हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या भीषण घटनेत चार महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळी हंगामात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने जंगलात जात आहेत. त्यानुसार शुक्रवारी, २२ मे रोजी पहाटे गुंजेवाही येथील काही महिला नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. सकाळी साधारण आठच्या सुमारास झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाने अतिशय वेगाने आणि सलग हल्ले करत महिलांना बचावाची कोणतीही संधी दिली नाही. या दुर्दैवी घटनेत चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर जंगल परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस पथकाने परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला आहे.
या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांची ओळख पुढीलप्रमाणे आहे. कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय ४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय ४६), संगीता संतोष चौधरी (वय ३६) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (वय ३३).
दरम्यान, एकाच वेळी चार महिलांचा जीव गेल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून संबंधित भागात गस्त वाढविण्यात आली आहे. या घटनेमुळे सिंदेवाही परिसर हादरला असून तेंदूपत्ता हंगामात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे आला आहे.








