मुंबई: ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून सोमवारी, दि. 22 रोजी तब्बल 24962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली. यामध्ये मुंबई वगळता उर्वरित राज्यात म्हणजे महावितरणच्या कार्यक्षेत्रात 21580 मेगावॉट तर मुंबईमध्ये 3382 मेगावॉट विजेची मागणी होती.
सध्या ऑक्टोबर हिटच्या झळांनी विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. उन्हाळ्यातील मागणीपेक्षाही ऑक्टोबर महिन्यात विजेची अधिक मागणी नोंदविण्यात येत आहे. राज्यात गेल्या दि. 16 ऑक्टोबरला 24922 मेगावॉट तर महावितरणकडे 21542 मेगावॉट, दि. 17 ऑक्टोबरला 24687 मेगावॉट तर महावितरणकडे 21223 मेगावॉट विजेची मागणी होती. त्यानंतर दि. 22 ऑक्टोबरला ही मागणी 24962 मेगावॉटवर गेली.
आजवरची ही उच्चांकी मागणी आहे. याच दिवशी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात 21580 मेगावॉट विजेची मागणी होती. एकदम विजेची मागणी वाढल्यामुळे योग्य नियोजनाद्वारे महावितरणकडून 20630 मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला. राज्यात ज्या वाहिन्यांवर सर्वाधिक वीजहानी आहे, वीजदेयकांची वसुली अत्यंक कमी आहे अशा जी-1 ते जी-3 गटातील वाहिन्यांवर 950 मेगावॉट विजेचे भारनियमन करण्यात आले.
राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने 20630 मेगावॉट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने 24012 मेगावॉट वीज पारेषीत केली.