नागपूर : ‘कोणताही व्यक्ती ही त्याच्या जाती मुळे मोठी होत नसून त्या व्यक्तीतील गुण व कर्तृत्च यांच्या जोरावर मोठी होते. नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी चळवळीपासून आपले मित्र असलेले डॉ.पुरणचंद्र मेश्राम यांनी प्रतिकूल परिस्थीतीमध्ये स्वत:च्या कार्यतत्परतेच्या आधारावर ‘कुलसचिव’ पदापर्यंत यशस्वी कारकीर्द गाजवली, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग, जहाजबांधणी व केंद्रीय जलसंपदा नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निवृत्त कुलसचिव डॉ.पुरणचंद्र मेश्राम यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाप्रसंगी स्थानिक सीवील लाइन्स स्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यगौरव सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यामंत्री श्री. रामदास आठवले , कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर , , राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहय्य मंत्री, श्री. राजकुमार बडोले प्रामुख्याने उपस्थित होते.
राजकारणात चांगल्या गुणवत्ता धारक व कर्तृत्वान माणसांची वानवा आहे. लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी अशी चांगले माणसे निर्माण होऊन राजकारणात गुणात्मक परिवर्तन घडणे गरजेचे आहे. असे विचार गडकरी यांनी यावेळी मांडले. डॉ. मेश्राम यांच्या कर्तृत्व क्षमतेला लोकस्वीकाहर्यता प्राप्त होणे हेच त्यांच्या कार्यगौरव सोहळयाचे प्रमाणपत्र आहे, अशी भावना याप्रसंगी गडकरी यांनी व्यक्त केली.
दलित चळवळीतून विद्यापीठात मागासवर्गीय कर्मचा-यांच्या मागण्यासाठी तसेच अनुशेष भरण्याकरिता विद्यापीठावर लोकशाही मार्गाने आंदोलन करुन डॉ. मेश्रामांचे नेतृत्व पुढे आले, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यामंत्री श्री. रामदास आठवले यांनी मांडले. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहय्य मंत्री, श्री. राजकुमार बडोले यांनी यावेळी विद्यार्थी जीवनातील मेश्रामांसोबतच्या आठवणींना आपल्या भाषणातूण उजळा दिला. मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन एका चतृर्थश्रेणी कामगारापासून एम.फिल व पी.एच.डी. सारखी ज्ञानसंपदा प्राप्त करून विद्यापीठाच्या कुलसचिव पदापर्यंत झेप घेतली, ही बाब गौरस्वापद असल्याचे विधानपरिषद सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.
हा केवळ एका कुलसचिवाचा सत्कार नसून तो आंबेडकरी चळवळीचा सत्कार आहे, अशी भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यगौरव सोहळा आयोजन समितीचे संयोजक डॉ. गिरीष गांधी, कराड येथील क्रिम्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मित्रा, जेष्ठ पत्रकार उस्मान नौशाद, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यापीठ प्रशासकीय कामकाजात कुलसचिव या नात्याने आपण विविध कार्य केले . डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचे अनेक पैलूंचे दालन ‘ द आर्क्रिटेक्ट ऑफ मॉर्डन इंडीया’ या नागपूर विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या गौरवग्रंथामूळे जनतेला खुले झाले. लॉ कॉलेजमधील प्रस्तावित संविधान पार्क तसेच इंटरनॅशनल बुद्धीस्ट स्टडीज् सेंटर येथे बुद्धीस्ट सेमीनरी प्रकल्प यांच्या पुर्ततेसाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी भावना सत्काराला उत्तर देतांना डॉ. मेश्राम यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. मेश्राम यांचा पत्नी राजश्री मेश्राम यांच्या समवेत केंद्रीय मंत्री गडकरी व आठवले यांच्या हस्ते बुद्धमुर्ती, मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराचे मानपत्राचे वाचन विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शेलेंद्र लेंडे यांनी केले; कार्यक्रमास विधानपरिषद आमदार नागो गाणार ,आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल हिरेखान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी, उपस्थित होते.