Published On : Sun, Feb 4th, 2018

राज्यातील विद्यापीठातून ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रम राबविणार – राज्यपाल चे. विद्यासागर राव

Advertisement

मुंबई : तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील विद्यापीठातून ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले. माहिम येथील रुपारेल महाविद्यालयात वृक्ष मित्र या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित ५७ व्या वार्षिक भाज्या, फळे, फुले प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील विद्यापीठातून ३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक विद्यार्थी एक वृक्ष’ हा उपक्रम राबविल्यास ३० लक्ष नवीन वृक्षांची लागवड करण्यात येईल, यासाठी राज्यभरातील कुलगुरुंना सूचना करणार असल्याचे श्री. राव यांनी यावेळी सांगितले.

श्री.राव म्हणाले, पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून पाच कोटींपेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे. वृक्ष मित्र संस्थेमार्फत गेल्या 57 वर्षांपासून पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. या संस्थेने जिल्हास्तरावर आपल्या शाखा स्थापन करुन पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करावी. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. वृक्ष मित्र या संस्थेमार्फत प्रत्येक हाऊसिंग सोसायटीला झाडे लावण्याबाबत प्रवृत्त करण्यासाठी अभियान राबवावे. इमारतींच्या छतावर बगिचा विकसित करण्याबाबत जनजागृती करावी, असेही आवाहन श्री.राव यांनी यावेळी केले.

यावेळी वृक्ष मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक कोठारी, उपाध्यक्ष डॉ.अरुण सावंत, सचिव श्रीमती सकिना गाडीवाला, माजी अध्यक्ष डॉ.फिरोजा गोदरेज, रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार देसाई, डॉ.चंद्रकांत साळुंखे आदी उपस्थित होते.