Published On : Sat, Sep 29th, 2018

सामान्यांना उत्तम सेवा देणे हीच मनपा अधिकाऱ्यांची भावना : आयुक्त रवींद्र ठाकरे

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेत काम करणारा प्रत्येक अधिकारी-कर्मचारी हा सेवाभावनेनेच काम करतो. शहरातील सामान्य नागरिकांना उत्तम सेवा देणे हीच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भावना असते. येथील प्रत्येक कर्मचारी समस्या सोडविण्यास तत्पर असतो. अशात चांगल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ही सेवाकार्यात मोठी पोकळी निर्माण करणारी ठरते, असे भावोद्‌गार मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी काढले.

नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता स्थावर अधिकारी आर. एस. भुते, कनिष्ठ अभियंता एस.डी. तारे यांच्यासह १९ अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी अपर आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, नगरसेवक मनोज सांगोळे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, राजेश भूतकर, संजय जयस्वाल, कनिष्ठ अभियंता राठोड, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, सहायक आयुक्त राजू भिवगडे, राजेश कराडे, निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक अधीक्षक (वित्त) दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक (सा.प्र.) मनोज कर्णिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले, असंख्य अडचणींचा उल्लेख न करता मनपाचे अधिकारी-कर्मचारी अविरत काम करीत असतो. येथील सर्वांमध्ये चांगले गुण आहेत. फक्त व्यासपीठ मिळत नाही. शक्ती आहे. आता इच्छाशक्ती वाढवायची आहे. मनपा कर्मचाऱ्यांना आता नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत जुनीच टीम नव्या ऊर्जेने काम करताना दिसेल, असेही ते म्हणाले.

सेवानिवृत्तीबद्दल कार्यकारी अभियंता आर. एस. भुते, कनिष्ठ अभियंता एस.डी. तारे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अपर आयुक्त अझीझ शेख, सहायक आयुक्त महेश धामेचा, मुख्य अभियंता मनोज तालेवार यांच्यासह अन्य मान्यवरांनीही यावेळी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांबद्दल आपली भावना व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना कार्यकारी अभियंता आर. एस. भुते म्हणाले, नागपूर महानगरपालिकेकडे आपण नेहमीच पालक म्हणूनच बघितले. जी जबाबदारी मिळाली ती प्रामाणिकपणे पूर्ण केली. त्याचेच समाधान आज या निवृत्तीसमयी आहे. यापुढेही आपण विविध सामाजिक सेवाकार्यात अविरत कार्यरत राहू, असे म्हणत झालेल्या गौरवाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

तत्पूर्वी कार्यकारी अभियंता आर. एस. भुते, कनिष्ठ अभियंता एस. डी. तारे यांच्यासह १९ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार किशोर तिडके यांनी मानले. कार्यक्रमाला डोमाजी भडंग, दिलीप देवगडे, किशोर तिडके, सुरेश शिवणकर, अतुल पापडकर, विनय नानवटकर, दिलीप तांदळे आदी उपस्थित होते. निवृत्त झालेल्या अन्य कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ निरीक्षक एस. एस. शेलार, मोहरीर आर. जी. रामटेके, मुख्याध्यापिका चंद्ररेखा वाकोडीकर, सहायक शिक्षिका उषा राऊत, शारदा मार्चवटवार, सहायक शिक्षक अरविंद जैन, सहायक शिक्षिका स्नेहलता टेंभेकर, वंदना बरिये, चपराशी हरनामसिंग खरे, क्षेत्रा कर्मचारी परसराम रामटेककर, मजदूर चंद्रकांत झुरे, चेकर अनंत खेडकर, मजदूर अशोक मोडकर, मोहरीर किशोर लोहितकर, सफाई कामगार लता तांबे, सफाई कामगार गोविंदा रामटेके, आशा गायकवाड यांचा समावेश आहे.