Published On : Mon, Jul 16th, 2018

शेतकऱ्यांना जगवणाऱ्या दुधाच्या धंदयाकडे दुर्लक्ष योग्य नाही – अजित पवार

Advertisement

Ajit Pawar, Nagpur

नागपूर : दुष्काळ परिस्थितीत…अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना जगवणारा दुधाचा धंदा असून सरकारने याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. सरकार शेतकऱ्यांना समाधानी करण्यास कमी पडत आहे अशी जोरकस टिका विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारवर केला. दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा हमीभाव मिळावा यासंदर्भात मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आज राज्यभर दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दुधाच्या संदर्भात अध्यक्षांच्या उपस्थितीत पावणे तीन वर्षांपूर्वी एक बैठक झाली होती. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. दुधाच्या पावडरला ३ रूपये तर दुधाला ५ रूपये देण्याची मागणी आहे. पण सरकार वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. हे काही बरोबर नाही असा आरोपही पवारांनीन केला.

सरकारने दुध उत्पादकाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. सरकार शेतकऱ्यांना समाधानी करण्यास कमी पडत आहे. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरत आहे. टँकर जाळले जात आहे असेही ते म्हणाले.

दुध उत्पादक शेतकऱ्यांना ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार दर देण्याचे सरकारतर्फे बोलले जात आहे. याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होणार नाही. सरकारने व्यवहारी मार्ग काढला पाहिजे. सरकारने योग्य भूमिका घ्यावी. आज संपूर्ण शेतकरी जातीचे लक्ष या अधिवेशनाकडे आहे. शेतकऱ्याला एका लिटरच्या निर्मितीला २५ ते ३० रुपये खर्च येतो मात्र शेतकऱ्यांना १७ ते २० रुपये दर मिळतो. त्यामुळे सरकारने सर्व कामकाज बाजूला ठेवून या मुद्दयावर चर्चा करावी अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली.