
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कथित घोडेबाजाराच्या आरोपांवर भाजप आमदार परिणय फुके यांनी जोरदार पलटवार केला आहे. अशा प्रकारचे आरोप करून काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांवर आणि मतदारांवरच अविश्वास दाखवत असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फुके यांनी प्रश्न उपस्थित केला की, घोडेबाजाराचे आरोप नेहमी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींशीच का जोडले जातात? जर काँग्रेसला वाटत असेल की त्यांचे नगरसेवक किंवा सदस्य सहजपणे प्रभावाखाली येऊ शकतात, तर हा त्यांच्या पक्षाच्या संघटनात्मक क्षमतेवरच प्रश्न निर्माण करणारा मुद्दा आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फुके यांनी ठोस पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. आरोपांमध्ये तथ्य असते तर ते आतापर्यंत जनतेसमोर आले असते. केवळ चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नगरसेवकांच्या सहलीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना फुके म्हणाले की, भाजपचा प्रशिक्षण कार्यक्रम आधीपासूनच निश्चित करण्यात आला होता. अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन पक्षाकडून नियमितपणे केले जाते. कार्यक्रमानंतर काही जण वैयक्तिकरित्या फिरायला गेले असतील, तर त्याचा विपर्यास करू नये, असे त्यांनी नमूद केले.
दिल्लीत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवर भाष्य करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढली असल्याचे त्यांनी म्हटले.
भंडारा येथील राजकीय घडामोडींवर बोलताना फुके यांनी काही नेत्यांनी स्वतःची विश्वासार्हता गमावल्याचा दावा केला. तसेच राज्यातील राजकीय नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचे सांगितले.
शेतकरी, सामान्य नागरिक आणि विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या धोरणांमुळे आगामी काळातही जनतेचा पाठिंबा भाजपलाच मिळेल आणि २०२९ च्या निवडणुकांमध्ये पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.







