
नागपूर : राज्यात अमली पदार्थांच्या सेवनामुळे घडणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने ड्रग्सविरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. सरकारने ‘झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्स’ धोरणाची कठोर अंमलबजावणी करून अशा घटनांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी त्यांनी केली.
देशमुख म्हणाले की, मुंबईतील गोरेगाव आणि वरळी येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुणांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यातही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ड्रग्सविरोधातील यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ताडदेव येथील कार्यक्रमाला सुरुवातीला परवानगी नाकारल्यानंतर ती पुन्हा कशी देण्यात आली, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
खरीप हंगाम तोंडावर असताना राज्यातील अनेक भागांत युरिया आणि मिश्र खतांचा तुटवडा जाणवत असल्याचा दावा करत देशमुख यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, असे म्हटले. पुढील काही दिवसांत पेरणीला सुरुवात होणार असल्याने खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महागाईच्या मुद्द्यावर बोलताना घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार वाढल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
खत विक्रीतील कथित ‘लिंकिंग’ प्रकारावरही देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांना गरज नसलेली उत्पादने किंवा खते खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीबाबत विचारले असता, संस्थात्मक कामकाजाच्या संदर्भात अशा भेटी होत असतात. त्याला राजकीय रंग देण्याचे कारण नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.







