
बीड : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहिनीनाथ गड परिसरातील चिखली येथील शेतकरी दिनकर लाड यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली थाई पांढऱ्या जांभळाची बाग आणि केळी पीक अवकाळीच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाले आहे.
दुष्काळी परिस्थितीत थेंब-थेंब पाण्याचे नियोजन करत दिनकर लाड यांनी जांभळाची फळबाग फुलवली होती. बाग ऐन काढणीच्या टप्प्यावर असताना अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीमुळे जांभूळ बागेचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय त्यांच्या केळी बागेतील जवळपास २५० झाडे वादळी वाऱ्यामुळे कोसळून जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे उत्पादनाची मोठी हानी झाली असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत.
फक्त दिनकर लाड यांच्याच नव्हे तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अवकाळीने नव्या अडचणी उभ्या केल्या आहेत.
अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची खंत व्यक्त करत दिनकर लाड यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
अवकाळीच्या या तडाख्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.







