Published On : Wed, Jun 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

बारावीच्या निकालात मोठा घोळ; हजारो विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर फोटोच नाही; बोर्डाचा तातडीचा निर्णय

मुंबई : राज्यातील बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदाच्या बारावीच्या निकालानंतर काही विद्यार्थ्यांच्या छापील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवर छायाचित्र मुद्रित न झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या त्रुटीची दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ३३ हजार ०५८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. मात्र निकालानंतर काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवर छायाचित्रे छापली गेली नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब मुंबई विभागीय मंडळाने राज्य मंडळाच्या लक्षात आणून दिली.

Gold Rate
June 03- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 155,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,500 /-
Silver/Kg ₹ 2,62,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांची स्पष्ट छायाचित्रे पुन्हा सादर करण्याचे आदेश शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे फोटो JPG स्वरूपात पाठवणे आवश्यक असून प्रत्येक फोटो फाइलला विद्यार्थ्याचा सीट क्रमांक नाव म्हणून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच फोटोचा आकार ५० केबीपेक्षा कमी ठेवण्याच्या सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.

यंदा प्रथमच गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकाच दस्तऐवजात देण्याची नवी व्यवस्था लागू करण्यात आली होती. या दस्तऐवजात विद्यार्थ्यांचा फोटो आणि क्यूआर कोड समाविष्ट करण्यात आला होता. बनावट कागदपत्रांना आळा बसावा आणि पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, हा या बदलामागील उद्देश होता.

मात्र अनेक विद्यार्थ्यांचे हॉलतिकिटावरील फोटो अस्पष्ट किंवा चुकीचे असल्याने बोर्डाने यापूर्वी फोटो करेक्शन पोर्टल सुरू करून शाळांना सुधारित छायाचित्रे अपलोड करण्याची संधी दिली होती. मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान फोटो आणि नाव दुरुस्त करण्यासाठी अंतिम मुदतही देण्यात आली होती. तरीही काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण न होणे, अंतिम मुदतीबाबत संभ्रम आणि विद्यार्थी-पालकांपर्यंत माहिती न पोहोचल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर चुकीचे, अस्पष्ट किंवा अनुपस्थित छायाचित्र आहे, त्यांनी तातडीने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा किंवा संबंधित विभागीय मंडळ कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges