
राज ठाकरेंनी आजच्या मोर्चासाठी मोठी ताकद लावली असून ते मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे आदी भागातून पक्षाच्या ताकदीचा उपयोग करून घेतल्याचे दिसत आहे. आज सकाळपासून नाशिक-पुण्याहून अनेक मनसैनिक मुंबईच्या दिशेने धावत आहेत. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून सुरु होईल तो चर्चगेट रेल्वे स्टेशनवर थांबेल. या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द राज ठाकरे करतील.
किड्या- मुंग्यांसारखं मरणार की आपल्या न्याय हक्कासाठी रेल्वे मुख्यालयावर धडक देणार असे भावनिक आवाहन करत राज यांनी मुंबईकरांना मोर्चात सहभागी व्हावे अशी हाक सोशल मिडियाद्वारे दिली होती. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. याशिवाय मुंबईतील मनसे पदाधिका-यांनी तीनही लाईनवर जाऊन रेल्वे गाड्यातील प्रवाशांना या मोर्चात सामील होण्याबाबत साद घातली होती.
मागील आठवड्यात 29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर राज ठाकरेंनी रेल्वेच्या समस्यांबाबत आपला राग व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. सोबतच हा राग व्यक्त करण्यासाठी राज यांनी मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.








