Published On : Tue, Jun 22nd, 2021

ठाकरे सरकार घाबरले, अपयश लपविण्याचे प्रयत्न : आ.कृष्णा खोपडे

Advertisement

दोन दिवसाचे अधिवेशन घेऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका


नागपूर : घरी बसून काम करणारे ठाकरे सरकारने पुन्हा घाबरले आहे. त्यामुळे जनसमस्यांकडे कानाडोळा करीत दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय या सरकारने घेतला. वास्तविक या दिड वर्षाच्या कालकीर्दीत कुठलेली महत्वाचे काम या सरकारने करून दाखविले नाही.

तिघाडीचे भांडणं व राजकारण करण्यात या कामचलाऊ सरकारचे दोन वर्ष निघाले. मात्र विकासकामात शून्य व कोरोना मध्ये अव्वल असे या सरकारचे कामकाज राहिले आतापर्यंत कोणतेही मोठे काम या सरकारने करून दाखविले नाही. अनेक समस्या यथावत आहेत. मग मराठा आरक्षण असो की ओ.बी.सी.चे आरक्षण, पदोन्नतीमध्ये आरक्षण, शेतक-यांचे प्रश्न, राजकारणात अडकलेली विकासकामे, प्रश्नाचा भडीमार करण्यास आम्ही सज्ज आहोत.

पण सरकार ऐकण्याच्या तयारीत नाही. नांदेड भागातील विद्यमान आमदार दिवंगत झाल्यामुळे दोन दिवसाच्या अधिवेशनात एक दिवस श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात जाईल. त्यामुळे एक दिवसाच्या अधिवेशनात कोणतेही प्रश्न मार्गी लागणे अशक्य आहे. आपले अपयश जनतेसमोर येऊ नये, त्यामुळेच या अधिवेशनात जनतेच्या समस्यांना सामोरे जायचे नाही, अशी या सरकारची भूमिका असल्याचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले.

आमदार कृष्णा खोपडे पुढे म्हणाले की, तिकडे शरद पवार महाराष्ट्रातील जनतेला वा-यावर सोडून राष्ट्रमंच उभारण्याच्या तयारीत आहे. तर इकडे उद्धव ठाकरे स्वत:ला मोदींसारखा ब्रान्ड म्हणवून घेत आहेत तर कधी जोडे मारण्याची भाषा मुख्यमंत्री करीत आहेत. तिकडे दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर काहींना वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाना पटोले बडबोलेपण करून कॉंग्रेसचे अस्तित्व टिकविण्याचा अपयशी प्रयत्न करीत आहे. तर संजय राऊत काय म्हणतात, हे त्यांनाच कळेनासे झाले आहे. सरनाईकांच्या लेटरबामने राज्याच्या राजकारणात खळबळ माजविली आहे. तर सेना अनिल परब यांना वाचविण्याचे कसोसीने प्रयत्न करीत आहे.

एकंदरीत या तिकडम सरकारमध्ये सर्व गोलमाल सुरु आहे. यांचे स्वत:चेच इतके प्रश्न आहेत की जनतेच्या समस्या काय सोडविणार?

अशी तिखट प्रतिक्रिया आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.