
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होत असतानाच पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तब्बल २२ आमदारांसह भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचा दावा रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
रोहित पवार म्हणाले की, या हालचालींबाबत चर्चा आधीच पूर्ण झाली असून योग्य वेळेची प्रतीक्षा सुरू आहे. काही आमदारांची भूमिका निश्चित झाली असून भविष्यात मोठे राजकीय बदल पाहायला मिळतील, असे संकेत त्यांनी दिले. हे सर्व २०२९ च्या निवडणुकीपूर्वी अपेक्षित होते, मात्र प्रक्रिया वेगाने पुढे गेल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांचाही उल्लेख करत सत्ताधारी गटात मोठ्या प्रमाणावर राजकीय पुनर्रचना होण्याची शक्यता व्यक्त केली. भाजपसोबत असलेल्यांशी आम्ही जाणार नाही, मात्र भाजपची साथ सोडून कोणी आले तर त्यांचे स्वागत करू, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गोंधळामुळे पक्षातील नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर ही केवळ कारकुनी चूक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले, तरीही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सुनेत्रा पवार यांनी एप्रिलमध्ये पाठवलेल्या नव्या पत्रातही पटेल आणि तटकरे यांच्या पदांबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रम अधिक वाढला. पटेल यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश कायम ठेवण्यात आला असला, तरी अधिकृत पद नोंदवण्यात आलेले नाही. तटकरे यांच्या नावासमोरही प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय सरचिटणीस अशी जबाबदारी नमूद करण्यात आलेली नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा असून पार्थ पवार आणि पटेल-तटकरे गटात मतभेद तीव्र होत असल्याचे बोलले जात आहे. पवार कुटुंबाकडून पक्षावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना काही नेत्यांकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.








