
नागपूर : देशभरात इंधन बचतीचा मुद्दा ऐरणीवर असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आदर्शवत पाऊल उचलले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पांच्या पाहणीसाठी होणाऱ्या दोन दिवसीय दौऱ्यात गडकरी मोठ्या वाहन ताफ्याऐवजी बसने प्रवास करणार आहेत. या प्रवासात अधिकारी, पत्रकार आणि सुरक्षा कर्मचारीही सहभागी होणार असल्याने सामूहिक प्रवासाचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
१४ आणि १५ मे २०२६ रोजी आयोजित या दौऱ्यासाठी गडकरी यांनी पुणे शहर पोलिस आयुक्त, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हाधिकारी तसेच संबंधित पोलिस अधीक्षकांना अधिकृत पत्र पाठवले आहे. पंतप्रधान Narendra Modi यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाचा उल्लेख करत वाहतुकीत होणारा अनावश्यक इंधन वापर कमी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या नेहमीपेक्षा निम्म्यावर आणण्याचे निर्देश प्रशासनाला देण्याची विनंती केली आहे. राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने इंधन बचत महत्त्वाची असल्याचे नमूद करत सामूहिक प्रवासामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील आणि नागरिकांची गैरसोयही कमी होईल, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
सामान्यतः व्हीआयपी दौऱ्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय आणि नागरिकांना होणारा त्रास यावर नेहमीच टीका होत असते. मात्र गडकरी यांच्या या निर्णयामुळे ‘कृतीतून संदेश’ देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
इंधन बचतीसाठी वरिष्ठ नेत्यांनी स्वतः पुढाकार घेतल्यास त्याचा सकारात्मक परिणाम प्रशासन आणि सर्वसामान्यांवरही होऊ शकतो, अशा प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.








