
नागपूर : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या ‘झीनत’ या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे दोन राज्यांच्या वन विभागांनी संयुक्तपणे राबविलेल्या आंतरराज्यीय व्याघ्र पुनर्वसन प्रकल्पाला मोठे यश मिळाले असून वन्यजीव संवर्धन क्षेत्रात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविणे आणि आनुवंशिक विविधता टिकवून ठेवणे या उद्देशाने ओडिशा सरकारने ताडोबामधून वाघांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये ‘जमुना’ आणि ‘झीनत’ या दोन वाघिणींना ताडोबातून सिमिलीपालमध्ये हलविण्यात आले होते.
मात्र, डिसेंबर २०२४ मध्ये ‘झीनत’ने सिमिलीपालची हद्द ओलांडत झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यामुळे वन विभागाची चिंता वाढली होती. त्यानंतर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या वन विभागांनी संयुक्त मोहीम राबवत झीनतला सुरक्षितपणे पकडले. काही महिने विशेष देखरेखीखाली ठेवल्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये तिला पुन्हा सिमिलीपालच्या जंगलात सोडण्यात आले.
जंगलात परतल्यानंतर स्थानिक नर वाघासोबत तिचे मिलन झाले आणि आता झीनतने चार गोंडस बछड्यांना जन्म दिला आहे. वन विभाग सॅटेलाइट कॉलरच्या माध्यमातून वाघीण आणि तिच्या बछड्यांवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याने येथील वाघ इतर अभयारण्यांतील व्याघ्रसंवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यापूर्वीही ताडोबामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प येथे वाघिणींचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे.
झीनतच्या चार बछड्यांच्या जन्मामुळे सिमिलीपालमधील व्याघ्रसंवर्धनाला नवी ऊर्जा मिळाली असून ताडोबाच्या समृद्ध व्याघ्र वारशाची आणखी एक यशोगाथा समोर आली आहे.







