Published On : Thu, May 10th, 2018

महावितरणचा समांतर वीज वाचनाचा कार्यक्रम यशस्वी

Advertisement

नागपूर: महावितरणच्या वीज ग्राहकांना अचूक वाचनाचे देयक मिळावे यासाठी महावितरणकडून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात समांतर मीटर वाचनाची मोहीम हाती घेतली आहे. मीटर वाचनात मीटर रीडर कडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सदर मोहीम राबवल्या जात आहे.

२०१८-१९ या आर्थिक वर्ष्यात वीज ग्राहकांना अचूक वीज देयक देण्याचा संकल्प नागपूर परिमंडल कार्यालयाने केला आहे. या संकल्पाला अनुसरून महावितरणच्या नागपूर परिमंडलात येणाऱ्या ९ विभागात टप्प्याटप्याने सुरवात करण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक विभागाने मीटर रिडींग दिवस निर्धारित करून त्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी ग्राहकांच्या घरी जाऊन मीटर मधील वापरलेल्या युनिटची समांतर नोंद घेणार आहेत.

वीज ग्राहकांना अचूक नोंदीचे देयक मिळावे यासाठी महावितरण यंत्रणा प्रयत्नशील असते. मीटर वाचन करणाऱ्या खाजगी संस्थेच्या कर्मचाऱ्याने मीटर वाचन करतेवेळी अनिमियतता करू नये,जर केल्यास वेळीच ती निदर्शनास यावी यासाठी महावितरणकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम राबवल्या जात आहे. संपूर्ण वर्षभर ही मोहीम सुरु राहणार आहे. सदर मोहिमेच्या काळात महावितरणचे अधिकारी – कर्मचारी समांतर वीज वाचनासाठी आपल्या दारी येऊ शकतातत्यांना सहकार्य करावे. जर मीटर संबधी तक्रार असल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहक आपली तक्रार उपविभागीय कार्यालयात करू शकतो असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वर्धा जिल्यातील आर्वी विभागात आणि नागपूर ग्रामीण मंडलातील सावनेर विभागात मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.सावनेर विभागात सावनेर शहरात हि मोहीम राबवण्यात आली. यात सावनेर उपविभागातील १०१ कर्मचारी सहभागी झाले होते. ५६५४ वीज ग्राहकांचे मीटर तपासून मीटरमधील वापरलेल्या युनिट्सची नोंद घेण्यात आली. यात ६१ मीटर धीम्या गतीने फिरत असल्याचे आढळून आले. २३५ वीज मीटर संशयास्पद आढळले . ११ वीज मीटरमध्ये चुकीची दर श्रेणी लावल्याचे आढळून आले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी विभागात राबवण्यात आलेल्या मोहिमेत १८७ अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी आर्वी,आष्टी,कारंजा, खरांगणा उपविभागातील ३१४५ ग्राहकांच्या मीटर मधील नोंदी घेण्यात आल्या. यात ८५ वीज मीटर नादुरुस्त आढळून आले. ६ वीज ग्राहकांनी अन्य कारणासाठी वीज पुरवठा वापरात असल्याचे तर आष्टी येथील ३ आणि कारंजा येथील १ वीज ग्राहक अनधिकृत वीज पुरवठा वापरात असल्याचे निदर्शनास आले.