Published On : Thu, May 10th, 2018

प्लॉस्टिक कॅनचा ड्रिपसाठी वापर करुन जगवले 3 हजार वृक्ष

Advertisement

Plastic Can use for water dripping, Trees in melghat

नागपूर/मेळघाट: समाजाकडून उपेक्षित राहिलेल्या अनाथ मतीमंदांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने धडपणाऱ्या महात्मा गांधी विकलांग केंद्राच्या माध्यमातून 138 बहुविकलांग व मतीमंद मुलांचा सांभाळ करताना या बालगोपालाच्या सहाय्याने सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या वझ्झर येथील उजाड टेकडीवर नंदनवन फुलविण्याच्या राज्यातील पहिला प्रयोग शंकरबाबा पापडकर यांनी यशस्वी केला आहे. परंतु तिव्र उन्हाळयातही लावलेले झाडे जगविण्यासाठी मतीमंद मुलांनी प्लॉस्टिक कॅनचा ड्रिप सिंचनाचा वापर हा वृक्ष संवर्धनासाठी आदर्श ठरला आहे.

मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या वझ्झर या गावात बहुविकलांग, मतीमंदी आणि अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी महात्मा गांधी विकलांग व पुनर्वसन केंद्र शंकरबाबा पापडकर यांनी सुरु केले आहे. अंबादासपंथ वैद्य विकलांग बेवारस बालगृहाच्या माध्यमातून राज्यात बेवारस सापडलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी या संस्थेने स्विकारली आहे. अनाथ मतीमंदाचे, बहुविकलांगाचे पालनपोषणासोबतच त्यांच्या पुनर्वसनाचे काम या संस्थेमार्फत चालविल्या जाते. अशा मुलांच्या पुनर्वसनाचा अभिनव प्रयोग शंकरबाबा पापडकर यांनी सुरु केला आहे.

अनाथ मतीमंद मुलांची पुनर्वसन करताना त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमता ओळखून ही मुले केवळ वृक्षारोपण व संवर्धन करु शकतात. त्यामुळे उजाड असलेल्या टेकडीवर वृक्षारोपण करुन अशा मुलांच्या सहाय्याने वृक्ष संवर्धनाचे कार्य सुरु करण्यात आले. मतीमंदांनी वृक्षारोपण करुन ती जगविण्याचा बहुदा राज्यातील पहिला प्रयोग सुरु करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी करताना तिव्र उन्हाळयातही लावलेले वृक्ष जगविण्याचा प्रयत्न होत असताना रिकाम्या प्लॉस्टिक कॅनचा वापर झाडे गजविण्यासाठी सुध्दा होवू शकतो. हे ओळखून झाडाच्या बुंद्याशेजारी प्लॉस्टिक कॅन ठेवून झाडाच्या मुळापर्यंत पाण्याचे थेंब पोहचतील अशा पध्दतीने प्लॉस्टिक कॅनचा वापर ड्रिप सिंचनासारखाच करण्यात आला. मतीमंद मुले सकाळी व सायंकाळी प्लॉस्टिक कॅन पाण्याने भरतात. ड्रिपच्या सहाय्याने दिवसभर झाडांना पाणी मिळत असल्यामुळे उन्हाळयात ही झाडे जीवंत ठेवण्यासोबतच संपूर्ण माळरान हिरवे झाले आहे. या अभिनव प्रयोगामुळे सुमारे तीन हजार वृक्ष मतीमंद मुलांनी जगविली आहे.

अनाथ मतीमंद तसेच बहुविकलांग मुलांची संगोपन करताना त्यांच्या पुनर्वसनाला सातत्याने प्रयत्नशिल असलेल्या शंकरबाबा पापडकरांनी अंध, अपंग मुलांना शिक्षण देवून त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले. परंतु मतीमंद असलेल्या मुलांना वृक्षारोपणा सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला. 1992 पासून सुरु केलेला या उपक्रमामुळे 15 हजार विविध प्रजातीची वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले. 80 अनाथ मतीमंद मुलांसोबत सकाळी 6 पासूनच वृक्षरोपण आणि संगोपनाला सुरुवात करतात. यामुळे मुलांच्या बौध्दीक आणि शारिरीक विकासाला चालना मिळते. अशा प्रकारचा यशस्वी प्रयोग शंकरबाबा पापडकरांनी राबविला आहे.

मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या या टेकडयांच्या परिसरात पाण्याची सुविधा निमार्ण करण्यासाठी दोन विहिरी खोदण्यात आल्या तसेच विंधन विहिरीला पाणी लागल्ययामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नतर सुटलाच त्यासोबत वृक्षारोपण मोहिमेला सुध्दा चालना मिळाली. प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत पाणी पोहचेल अशा पध्दतीने व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळयात पाणी टंचाई या दृष्टीने माथा ते पायथा या तत्त्वानुसार पावसाचे पाणी अडविण्यासाठी दगडांचा वापर करण्यात आला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी सहज उपलब्ध झाले. आतापर्यंत चिक्कू, डाळिंब, आवळा, फणस, आंबा, बोर, सिताफळ त्यासोबत कडुनिम, सागवन, सालई, बिबा, रक्तचंदन, बांबू, मोहा, रिठा, कडई आदी सुमारे 15 हजारपेक्षा जास्त झाडे अनाथ मतीमंद मुलांनी जगविली आहे.

यावर्षीच्या तिव्र उन्हात विविध प्रजातीची झाडे जगविण्यासाठी प्लॉस्टिक रिकाम्या कॅनचा वापर करण्यात आला. साधारणता तीन ते पाच लिटरच्या कॅन ड्रिपसाठी वापरल्यामुळे 3 हजार वृक्षांचे संवर्धन झाले आहे. शंकरबाबा पापडकर यांनी अनाथ मतीमंदाच्या पुनर्वसनासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन हा अभिनव मार्ग निवडला आणि यशस्वी करुन दाखविला आहे. अशा प्रकारचा प्रकल्प इतरांसाठी सुध्दा प्रेरणा तसेच मार्गदर्शक निश्चितच ठरणार आहे.