Published On : Fri, Sep 29th, 2017

मदत व चौकशी जाहिर केल्यानं राज्य सरकारची जबाबदारी संपत नाही;

Advertisement

Dhananjay Munde copy

मुंबई :- मुंबईतील एलफिन्स्टन-परेल रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीत 22 प्रवाशांचा झालेला मृत्यू हे सरकारच्या अनास्था व बेपर्वाईनं घडवलेलं हत्याकांड असून त्याबद्दल दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याबरोबरच मुंबईकरांना बुलेट ट्रेन पेक्षा सुरक्षित प्रवास महत्वाचा आहे त्यामुळे बुलेट ट्रेन साठी जे 5 हजार कोटी रु राज्य शासन खर्च करणार आहे ते तातडीने मुंबईच्या रेल्वेच्या सुधारणेसाठी वर्ग करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत व चौकशी समितीची घोषणा करुन राज्य सरकारनं आपली जबाबदारी झटकू नये, असा इशाराही श्री. मुंडे यांनी राज्य सरकारला दिला. मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वेपुलावरील चेंगराचेंगरीत 22 जण मृत्युमुखी पडल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याबद्दल श्री. मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले. श्री. मुंडे यावेळी म्हणाले की, मुंबईतील दादर, ठाणे, बोरिवली, अंधेरी, घाटकोपरसारख्या अनेक छोट्या-मोठ्या स्थानकांवरील रेल्वेपूल व फलाट हे मृत्यूचे सापळे बनले आहेत.

मुंबई रेल्वेचा प्रवास हा जगातला सर्वात असुरक्षित प्रवास बनला आहे. एल्फिन्स्टनचे नाव बदलून प्रभादेवी करण्यापलिकडे गेल्या तीन वर्षात रेल्वेची परिस्थिती सुधारण्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. मुंबईवर सातत्याने अन्याय करणाऱ्या मोदी सरकारने मुंबईसह देशातल्या लाखो रेल्वेप्रवाशांचा जीव धोक्यात ठेवून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट घातला. मोदी सरकारचा प्राधान्यक्रम कसा चुकीचा आहे हे या दुर्घटनेने दाखवून दिले आहे, परंतु त्यासाठी 22 निरपराध प्रवाशांना जीव गमवावा लागला, हे दुर्दैवी असल्याची खंतही श्री. मुंडे यांनी व्यक्त केली.

चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पटलेल्यांच्या कुटुंबियांना रेल्वेत नोकरी द्यावी, तसंच खाजगी उपचार घेत असलेल्या जखमींसह सर्वांच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा, बुलेट ट्रेन साठी जे 5 हजार कोटी रु राज्य शासन खर्च करणार आहे ते तातडीने मुंबईच्या रेल्वेच्या सुधारणेसाठी वर्ग करा अशी मागणीही श्री. मुंडे यांनी केली.