नागपूर: शिक्षकभरतीच्या नावावर शिक्षण संस्थांकडून सुरू असलेल्या गोरखधंद्याला चाप लावणारा ऐतिहासिक निर्णय घेत शिक्षण विभागाने शुक्रवारपासून ‘पवित्र’ या ऑनलाइन प्रणालीद्वारे भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू केला. या टप्प्यात शुक्रवारपासून पात्र उमेदवारांना स्वत:ची ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध झाली असून वर्षभरात सुमारे २० हजार शिक्षकांची पदे भरली जातील. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान भवन परिसरात ही घोषणा केली.
स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदानित आणि विनाअनुदानित पदांवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांच्या भरतीसाठी ‘पवित्र’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे काही संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकार पूर्णपणे बंद होतील. गुणवत्तेच्या आधारेच शिक्षकांची भरती होईल.
शिक्षक पदासाठी अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांवरून भरती होणार आहे. त्याअनुषंगाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नोंदणी पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निश्चित केलेले आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे आसन क्रमांक आणि त्यांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याचा दिनांक निश्चित केलेला आहे. दि 6 जुलै ते 23 ऑगस्ट 2018 या कालावधीत ही नोंदणी होणार आहे.