Published On : Mon, Jun 1st, 2020

टोळधाड रोखण्यासाठी फवारणी हा उत्तम पर्याय – कृषी विभाग

नागपूर: टोळधाडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी हा योग्य पर्याय असून फवारणी शक्यतोवर रात्री उशीरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झालेली असते व त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे कृषी विभागाच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विभागात नागपूर जिल्हयातील काटोल तालुका व वर्धा जिल्हयातील आष्टी तालुक्यात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. काटोल तालुक्यातील फेटरी, खानगाव शिवारासह आमनेर गोंदी या परिसरातही टोळ आढळून आली आहे. ही कीड तीच्या मार्गातील सर्वप्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करुन संपवून टाकते. ह्या किटकांच्या थव्याची व्याप्ती 10 किलोमीटर लांब व 2 किलोमीटर रुंद इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे.

Advertisement

या किडीचे थवे ताशी 12 ते 16 किलोमीटर इतक्या वेगाने उडतात. ही टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडत जातात, जातांना दिसेल त्या हिरव्या पानांचा फडशा पाडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान संभवते. सद्यस्थितीत काटोल, नरखेड, तालुक्यात संत्रा पिकावर या किडीने आक्रमण केले असून झाडांचे शेंडे खाऊन टाकलेले दिसत आहे. कृषी विभागाच्या सुचनेनुसार शेतकऱ्यांनी शेतात धुर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे व शेवटी फवारणी करणे सुरु केलेले आहे. सदर किडीच्या सामुहिक नियंत्रणासाठी ट्रक्टर ऑपरेटेड स्प्रेयर व अग्निशमन दलाच्या बंबांनी क्लोरोपायरीफॉस 80 लिटर किटकनाशकाची फवारणी काटोल परिसरात करण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे क्षेत्रिय भेटी देण्यात येतत असून शेतकऱ्यांना जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही एक महत्वाची कीड असून जेव्हा ही कीड समुहाने आढळून येते तेव्हा ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. वाळवंटी टोळ आपली अंडी ओल्या रेतीमध्ये 10 ते 15 सेमी आत समुहाने घालतात. एक मादी साधारणत: 150 ते 200 अंडी घालते, अंडी सर्वसाधारणपणे 10 ते 12 दिवसात उबवतात. पिल्ल अवस्था 22 दिवसात पूर्ण होते. प्रौढ अवस्था लांबपर्यंत अडून नुकसान करते.

शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेताच्या आजुबाजुला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे, संध्याकाळी रात्रीच्या वेळी झाडाझूडपांवर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावगस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित किटकनाशक आझाडिरेक्टिन 1500 पीपीएम 30 मिली किंवा 5 टक्के निंबोळी अर्काची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 20 किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये फिप्रोनिल 5 एससी 3 मिली मिसळावे व त्याचे ढिग शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व सदर अमिषामुळे ही कीड मरण पावते. मिथिल पॅराथिऑन 2 टक्के भूकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टर धुरळणी करावी.

टोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास किटकनाशक क्लोरोपायरीफॉस 20 ईसी 24 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 ईसी मिली किंवा डेल्टामेथिन 2.8 ईसी 10 मिली किंवा फिप्रोनिल 5 एससी 2.5 मिली किंवा ल्यांबडासायहेलोथ्रिन 5 ईसी 10 मिली किंवा मॅलाथिऑन 50 ईसी 37 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी शक्यतोवर रात्री उशीरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्यने झाडाझुडपांवर जमा झालेले असतात, त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळणे शक्य होते, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement