Published On : Tue, Sep 8th, 2020

कोरोनाबाबत नकारात्मक पोस्टमुळे सामाजिक नैराश्याचा धोका : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

Advertisement

 

सोशल मिडियावर बळी, बाधितांवर चर्चा: बरे होणाऱ्या रुग्णसंख्येबाबत जनजागृतीला बगल.

 

नागपूर: शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबळी वाढत आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. त्याचवेळी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र सोशल मीडियायावर प्रशासनाचे प्रयत्न, बरे होणाऱ्या रुग्नाच्या सकारात्मक पोस्टऐवजी बळी, बाधितांची आकडेवारी जाहीर करणाऱ्या पोस्टचीच बजबजपुरी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोनाबाबत काळजीऐवजी भीती वाढत असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊन काळात संयम बाळगणाऱ्या नेटकऱ्यांनी पुन्हा कोरोनाबाबत सकारात्मक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सोशल मिडियावर सध्या कोरोनाबाबत नकारात्मक घटनांचे व्हीडीओ, क्लिप्सची लाट आली आहे. त्याचे प्रतिकूल परिणामही समाजावर होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाबतची आकडेवारी दररोज आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध केली जात आहे. यात बाधित, बळींच्या आकड्यासोबतच उपचार घेत असलेले, उपचारातून बरे झालेल्या नागरिकांचीही आकडेवारी असते. याच आकड्यावरीचा संदर्भ घेत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर अनेकांच्या पोस्ट दिसत आहे. यात अनेकांकडून बळी, बाधितांच्या आकडेवारीचा उहापोह केला जात आहे. त्यामुळे नागरिकांत भीती वाढत असल्याचा निष्कर्ष सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविला. नेटकऱ्यांनी कोरोनातून मुक्त झालेले, यशस्वी उपचार घेत असलेल्या रुग्नाचीही माहिती पोस्ट केली तर नागरिकांत सकारात्मक वातावरण तयार होईल. नागरिकांत भीतीऐवजी काळजी घेण्याची भावना तयार होईल, असे पारसे यांनी सांगितले.

सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्यास कोरोनाबाबतची भीती नाहीशी होईलच, शिवाय नागरिकही यातून बरं होता येते या भावनेसह जीवनशैली अंगिकारातील. मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊन काळात घरात बसून सोशल मीडियायावरून अनेक सकारात्मक पोस्ट टाकून मानसिक बळ वाढवले. आता त्यापेक्षाही भयंकर स्थिती आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी भीती पसरविणाऱ्या पोस्ट न टाकता कोरोनाबाधितांचा आत्मविश्वास वाढेल, अशा पोस्ट टाकण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडूनही मोठे प्रयत्न होत आहे. मात्र प्रशासनाचे दोष दाखविणाऱ्या पोस्ट अधिक आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत प्रशासनाबाबत विश्वास निर्माण करणारी माहिती सोशल मीडियातून पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सोशल मीडियातील माहितीमुळे अनेक बदल घडून आले. त्यामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर आवश्य आहे. कोरोनाच्या संकटकाळात नकारात्मक माहितीचा प्रसार करण्याऐवजी कोरोनामुक्त झालेले नागरिक, त्यांची आकडेवारी, त्यांचे यशस्वी प्रयत्न यावर नेटकऱ्यांनी भर दिला तर कोरोनाशी लढणाऱ्या बाधितांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण होईल. नकारात्मक पोस्टमधून सामाजिक नैराश्य पसरवण्याचा धोका टाळण्याची जबाबदारी नेटकऱ्यांनी घ्यावी.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.