Published On : Tue, Aug 18th, 2020

सोशल मीडिया वॉर फेअरचा आता बॉलीवूडला फटका:अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ व विश्लेषक.

Advertisement

 

उगारले लाईक-डिसलाईकचे शस्त्र : प्रदर्शनापूर्वीच चित्रपटावर प्रतिकूल परिणाम.

 

नागपूर : गेल्या काही दिवसांत प्रदर्शनासाठी तयार चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी डिसलाईकचा पाऊस पाडत बॉलीवूडलाही जोरदार धक्का दिला. एकूणच सोशल मीडिया वॉरफेअर आता बॉलीवूडमध्ये कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्यापुरते मर्यादित राहिले नसून सामान्य नेटकऱ्यांनीही त्याचा वापर करणे सुरु केले. त्यामुळे आता सोशल मीडियावर लाईक-डिसलाईकमुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे भवितव्य ठरणार असल्याचे संकेत गेल्या काही दिवसातील घडामोडींनी दिले आहेत.

सोशल मीडियाने समाजातील सर्वच क्षेत्रांत निर्णयात्मक प्रभाव पाडला आहे . या यादीत आता बॉलीवूडचाही समावेश झाला. कोट्यवधींचे बजेट असलेल्या चित्रपटाचे भवितव्य सोशल मीडियाद्वारे काही सेकंदात लाईक-डिसलाईकने ठरविणे सुरू झाल्याचे सोशल मीडिया तज्ञ व विश्लेषक अजित पारसे यांनी नमूद केले.

गेल्या काही दिवसात बॉलीवूडमध्ये घडलेल्या घडामोडींनी संपूर्ण देश हादरला.अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अनभिज्ञ पैलू बाहेर आले. यातून सामान्य नेटकऱ्यापुढे बॉलीवूडमधील काही मंडळीचे पितळ उघडे पडले. यातूनच आता नेटकऱ्यांनी त्यांच्या चित्रपटावर डिसलाईकचे अस्त्र उगारले. याचा प्रदर्शनासाठी तयार असलेल्या मोठ्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांच्याकडून सामाजिक, राष्ट्रीय मुद्द्यावर बोलताना भान ठेवले जात नाही. एवढेच नव्हे तर त्यांची कृत्येहि सामान्य नागरिकांच्या अपेक्षा भंग करणारी आहे. अशा लोकांबाबत सामान्य नेटकऱ्यांत रोष वाढत आहे, असे पारसे म्हणाले.

नेटकरी सोशल मिडियातून लक्ष ठेवून असल्याची जाणीव या मंडळींनी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा अब्जावधींच्या व्यवसायाचे हे क्षेत्र डबघाईस येण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा पारसे यांनी दिला. कोरोना व इतर सर्वच प्रसंगी जनजागृती, पोलिस, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स यांचे मनोबल वाढवणे, प्रशासन, राजकीय निर्णयांमध्ये मत मांडणे, राष्ट्रीय मुद्यांवर पसंती, नापसंती दर्शवणे, हे नेटकऱ्यांनी केले. आता संगीत क्षेत्र, बॉलिवूडवर सुद्धा जनतेनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नजर केंद्रित केली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सत्ता गाजविन्यासाठी फक्त मोठे नाव, पैसा पुरेसा नाही, हि बाब समजून घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत केवळ बॉलीवूडमधील लोक जे करत होते, ते सोशल मीडिया वॉरफेअर सामान्य नेटकऱ्यांनी सुरू केले आहे, त्यामुळे कलावंत, दिगदर्शक, निर्माते व इतर तंत्रज्ञांनी कृती आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज पारसे यांंनी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसात चित्रपटाच्या ट्रेलरवर डिसलाईकचा पडलेला पाऊस बॉलीवूडसाठी धोक्याची घंटा आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे भवितव्य ठरविणे बॉलीवूडमधील मोठ्या संस्था करतात. आता हेच त्यांच्यावर उलटण्याची शक्यता नेटकऱ्यांनी सुरू केलेल्या सोशल मीडिया वॉरफेअरमधून दिसून येत आहे. नेटीझन्स अज्ञानी नाही, राष्ट्रीय, सामाजिक मुद्द्यावर चुकीच्या वक्तव्यावर ते पेटून उठतात. त्यामुळे बॉलीवूडमधील वाचाळवीर आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांनी सावध होणे आवश्यक आहे.

–अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ व विश्लेषक.