Published On : Fri, Jul 12th, 2019

श्री मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित

Advertisement

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2018-19 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक श्री.म.रा.जोशी यांना आज येथे घोषित करण्यात आला.रुपये 5 लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

श्री मधुकर जोशी हे संत साहित्यावरील ज्येष्ठ लेखक आहेत. लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याचा ज्ञानकोष याचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्टांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी आणि एम.फिलचे परिक्षक म्हणून त्यांनी अनेकदा काम केलेले आहे.

मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उजैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. श्री जोशी संत साहित्य विषयाचे पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे 200 हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइसम कडून प्रकाशित करण्यात आले आहेत. सार्थ तुकाराम गाथेची 400 हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील 3500 मराठी हस्तिलिकाहीखितांचे संशोधन करत आहेत. श्री मधुकर रामदास जोशीे यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी आज येथे सांगितले.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी श्री. रा. चिं. ढेरे, डॉ.दादा महाराज मनमाडकर, श्री जगन्नाथ महाराज नाशिककर, श्री. रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्री मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीमधील डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड या सदस्यांनी सदर निवड केली.