सातारा: ईव्हीएममध्ये ‘गडबड’ होते असा दाट संशय लोकांच्या मनात आहे. लोकशाहीत तो संशय दूर करून जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अढळ राखला पाहिजे, असे वक्तव्य करत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’ हटवण्याबाबत भाजप सोडून इतर पक्षांना एकत्र आणून निवडणूक आयोगाकडे आग्रह धरला जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले .
जगात जिथे जिथे ईव्हीएमचा वापर होत होता त्यांनी मतदान यंत्रांचा वापर बंद केला आहे असे नमूद करून ते म्हणाले की,
कर्नाटकात काँग्रेसच पुन्हा सत्तेवर येईल असे आता तरी दिसतेय, देशातील निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर तो आता बदलाला अनुकूल आहे. पण म्हणून लगेचच कोणाला किती जागा मिळतील या निष्कर्षाप्रत येणे म्हणजे ‘बाजारात तुरी आणि कोण कुणाला मारी’ असे होईल, असा टोला पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लगावला.
पंतप्रधान ही एक इन्स्टिटय़ूशन आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण कुत्रा काय, खेचर काय अशी भाषा वापरली जात आहे. पदाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व यांना दिसत नाही अशी टीका त्यांनी केली.
