Published On : Tue, Jun 5th, 2018

शिवसेनेची ताकद दिसल्याने अनेकांच्या मनात भीतीच वातावरण – संजय राऊत

Advertisement

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपासोबत युती नकरता स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे युती कायम राखण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र या भेटीआधीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “पालघर पोटनिवडणुकीत आमची ताकद दिसल्यानेच अनेकांना धडकी भरली आहे. पालघरमध्ये शिवसेनेची ताकद पाहिल्यानंतर अमित शहा यांना चार वर्षात पहिल्यांदाच मातोश्रीची आठवण झाली, असा टोला राऊत यांनी हाणला. ही परिस्थिती दुर्दैवी आहे. मात्र, त्याचवेळी शिवसेना ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

या भेटीबाबत प्रतिक्रिया देतांना राऊत म्हणाले कि, “पालघरमध्ये आम्ही निवडणूक लढवून दाखवली. यात भाजपाला निसटता विजय मिळाला. पण आमची मतं पाहून अनेकांच्या मनात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेनं निवडणूक कधी लढवली नव्हती, तिथे लाख लाख मतं मिळाली”

एनडीएमधील मित्रपक्ष एका मागे एक सोडून जात आहेत. देशातील राजकारण बदलतांना दिसत आहे. जनसामान्यांमध्ये भाजपविरोधात रोष आहे. त्यामुळे त्यांना (भाजपला) वाटत असेल, सगळ्यांना भेटून मोट बांधावी, त्यामुळे हे भेट होत असावी” असेही राऊत म्हणाले. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. शिवसेनेने ही भूमिका विचारपूर्वक घेतलेली आहे. जनमताचा कानोसा घेऊन ही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे या भूमिकेत बदल होईल असं वाटत नाही” असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

दरम्यान, युती कायम राखण्यासाठी भाजपाने खूपच जपून पावलं टाकणं पसंत केलं आहे. त्याचाच भाग म्हणून आता थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारी संध्याकाळी ७ वाजता ‘मातोश्री’वर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे.