Published On : Mon, Jul 3rd, 2017

पंढरपूरमध्ये वारक-यांच्या सेवेतून बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती जतन करणार: राधाकृष्ण विखे पाटील

Advertisement


पंढरपूर
: पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी संत सेवा करताना वारकऱ्यांना पंढरपुरात चांगल्या सुविधा निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वैष्णव सदन उभारण्यात आले असून भक्त निवासाची उभारणी करून पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती जतन करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पंढरपूर जवळ चंद्रभागेच्या काठावर पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील या वारकरी भक्त निवासाचे भूमिपूजन आ.भारत भालके यांच्या हस्ते झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून विखे पाटील बोलत होते. आ. बाळासाहेब मुरकुटे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील आदी मान्यवर समारंभाला उपस्थित होते. लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाने भटुंबरे येथे सहा एकर जागेत वारकरी सदन प्रकल्प हाती घेतला आहे.

विखे पाटील म्हणाले की,पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून जागा घेण्यासाठी प्रयत्नशील होते. योग्य जागा मिळाल्यानंतर तेथे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. साहेबांच्या कार्यकाळातच वैष्णव सदनच्या माध्यमातून भव्य सभागृह उभे राहिले. सहा महिन्यांपूर्वी साहेब कालवश झाले. त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करताना पंढरपूरमध्ये भव्य भक्त निवासाचे आज भूमिपूजन केले जात आहे. एका वर्षात त्याचा पहिला टप्पा पूर्ण होऊन वारक-यांना मोठी सुविधा निर्माण होईल. साहेबांच्या दुरदृष्टीतून हा प्रकल्प उभा राहत आहे.आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला हे काम सुरु होत असून त्यातून वारकऱ्यांची सेवा करताना साहेबांच्या स्मृती जतन करणे हा एकमेव उद्देश आहे असे विखे पाटील म्हणाले.


आ. भालके म्हणाले की, पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. बाळासाहेब विखे पाटील यांच्या सहवासात काम करताना त्यांची वारकऱ्यांविषयीची तळमळ मी जवळून बघितली. वारकरी समाधानाने परत जावेत यासाठी सुविधांची गरज असते. विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून पंढरपुरात हा मोठा प्रकल्प आकाराला येत आहे ही समाधानाची बाब आहे. यासाठी जर काही अडचणी आल्या तर सर्व प्रकारची मदत करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले.विठ्ठल साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री.कोळेकर, भटुंबरेचे सरपंच शिवाजी तावस्कर, माजी सरपंच फणसे बापू शिंदे, दादाभाऊ क्षीरसागर,गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, लोणीचे सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे,विकास सोसायटीचे अध्यक्ष चांगदेव विखे,ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष विखे ,माजी उपसरपंच अनिल विखे, मधुकर विखे, वसंतराव विखे, अण्णा म्हस्के,संजय धावणे,बाळासाहेब वाबळे, लक्ष्मण विखे,अशोक धावणे,शंकर विखे,सचिन विखे,प्रशांत म्हस्के, मच्छीन्द्र विखे,भारत महाराज धावणे, परशुराम विखे,नामदेव वाडगे आदींसह लोणी ग्रामस्थ, वारकरी, दिंड्यांचे चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार दादासाहेब म्हस्के यांनी स्वागत, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.