नागपूर: वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण व्हावे यासाठी महावितरणकडून राज्यात ठिकठिकाणी ग्राहक संवाद मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी मुख्य अभियंता पासून शाखा अभियंता वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी सलग दुसऱ्या दिवशी वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी काटोल उपविभागात येणाऱ्या पारडसिंगा शाखा कार्यालयात जातीने उपस्थित राहून वीज ग्राहकांसोबत संवाद साधला. महावितरणकडून वीज ग्राहकांना अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळ उपस्थित होते.
वीज देयकात दुरुस्ती, वीज जोडणी मिळण्यास होणार उशीर, ग्रामीण भागात कमी दाबाने मिळणारा वीज पुरवठा, रोहित्रावरील वाढलेल्या दाबाने निर्माण झालेली वीज समस्या या सारख्या तक्रारी वीज ग्राहक या मेळाव्यात करीत आहेत. महावितरणकडून वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न सुरु आहे.
महावितरणच्या मौदा विभागातील कामठी उपविभागात येणाऱ्या खसाळा, मौदा उपविभातील धामणगाव, मारोडी शिंगारी ग्राम पंचायत येथे मागील २ दिवसात संवाद मेळावे घेण्यात आले. खसाळा येथे आयोजित मेळाव्यात कामठी तालुका विदुयत नियंत्रण समितीचे सदस्य संपतराव पारेकर, सरपंच रवींद्र पारधी, महावितरण मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे, कामठी उपकार्यकारी अभियंता दिलीप मदने उपस्थित होते. धामणगाव येथे आयोजित मेळाव्यास सरपंच आरती मोटघरे, उप कार्यकारी अभियंता प्रफुल मोटघरे उपस्थित होते.
सावनेर उपविभागातील नांदागोमुख,येथे आयोजित मेळाव्यास मुख्य अभियंता दिलीप घुगल, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे उपस्थित होते. खापा उपविभागातील बडेगाव येथेही बुधवारी वीज ग्राहकांचा मेळावा घेण्यात आला. हिंगणा उपविभागात येणाऱ्या वाडी शाखा कार्यालय,वाघधरा , उमरेड विभागातील कुही येथे संवाद मेळावे घेण्यात आले.