छत्रपतींचा भगवा पेलण्याची नीतीमत्ता नसल्यानेच भगवा आम्ही खांद्यावर घेतलाय – खासदार डॉ. अमोल कोल्हे
नव्या स्वराज्याचा नवा लढा…
उस्मानाबाद : – ‘अ’ गेला तर ‘ब’ आहे आणि ‘ब’ गेला तर ‘क’ आहे आणि कुणीही पक्ष सोडून गेले तरी आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे त्यामुळे जाणारे खुशाल जावू देत अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वाशी येथील जाहीर सभेत मांडली.
येत्या निवडणुकीत कुणी फंदफितुरी केली तर त्याचा पाडाव करुन निवडणूका जिंकायच्याच आहेत असा आत्मविश्वास जयंत पाटील यांनी निर्माण केला.
पाच वर्षात काय केले हे लोकं विचारतील म्हणून आता अनेक घोषणा मुख्यमंत्री करत आहेत अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.
छत्रपतींचा भगवा पेलण्याची नीतीमत्ता नसल्यानेच भगवा आम्ही खांद्यावर घेतलाय – खासदार डॉ. अमोल कोल्हे
भगवा पेलण्यासाठी नीतीमत्ता असावी लागते. मात्र तुमची ती नीतीमत्ता नसल्यानेच आम्हाला छत्रपतींचा भगवा हाती घ्यावा लागला आहे. कारण तुम्ही जी फसवणूक केलात ती फसवणूक उघड करण्यासाठीच असल्याचे जाहीर आव्हान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाशीच्या जाहीर सभेत भगव्याची मक्तेदारी घेतलेल्यांना दिला.
महाराष्ट्रातील तरुण, महिला, शेतकऱ्यांनी ठरवलं आहे शिवस्वराज्य आणायचं म्हणूनच राज्यात निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले जात आहेत हा दोन यात्रेतील फरक लक्षात घ्या असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी केले.लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची ताकद तरुणांमध्ये आहे आणि हीच ताकद शिवस्वराज्य आणणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
सभेत आमदार राहुल मोटे, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी आपले विचार मांडले. शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत वाशी शहरात भव्य रॅली काढून करण्यात आले.शिवस्वराज्य यात्रेचा आजचा आठवा दिवस असून पहिली सभा उस्मानाबाद जिल्हयातील भूम – परंडा – वाशी विधानसभा मतदारसंघातील वाशी येथे पार पडली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार राहुल मोटे, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, आमदार सतिश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, जीवन गोरे आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.